
देशात बेरोजगारी पुन्हा वाढू लागलीय. रोजगाराची स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे 2025 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 5.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांच्या नोकऱयांवर अधिक परिणाम दिसून येतोय. त्यांचा बेरोजगारी दर 13.8 टक्क्यांवरून 15 टक्के पोहोचला आहे. तरुणींच्या बाबतीत तर परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.
बेरोजगारीतील ही वाढ ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये
दिसून आली असून विशेषतः तरुणांना व महिलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शहरी भागातील तरुणांची बेरोजगारी 17.9 टक्के झाली (एप्रिलमध्ये 17.2 टक्के होती), तर ग्रामीण भागात ती 13.7 टक्क्यांपर्यंत वाढली (एप्रिलमध्ये 12.3 टक्के होती). बेरोजगारीच्या आकडेवारीवरून तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागत आहे.
महिलांमध्ये जास्त बेरोजगारी
पुरुष आणि महिला दोघांसाठीही बेरोजगारी वाढली असली तरी मे महिन्यात महिलांमध्ये बेरोजगारीचा दर पुरुषांपेक्षा जास्त नोंदवला गेला. मे महिन्यात महिलांचा बेरोजगारीचा दर 5.8 टक्के होता, तर पुरुषांसाठी तो 5.6 टक्के होता.
शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडे वाढ
बेरोजगारीतील वाढ केवळ एकाच भागापुरती मर्यादित नाही. शहरी भागात बेरोजगारीचा दर मे महिन्यात 17.9 टक्क्यांवर पोहोचला, तर ग्रामीण भागात तो 13.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ दोन्ही ठिकाणी रोजगाराच्या संधींची कमतरता जाणवत आहे. काम करणाऱयांची संख्याही घटली.
कृषी क्षेत्रात घट
शेतीतल्या नोकऱयांमध्ये तात्पुरती घट झाली. एप्रिलमध्ये 45.9 टक्के लोक कृषी क्षेत्रात होते. ते आता 43.5 टक्के झाले. लोक औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात नोकऱया शोधत आहेत. काम करणाऱयांचा दर 52.8 टक्के होता. तो कमी होऊन 51.7 टक्के झाला.