मुंबईकरांसाठी ‘थेंबे थेंबे तळे साचे’! तलाव क्षेत्रात धुवांधार, पवई ओव्हरफ्लो

मुंबईकरांना पाणी पुरवठा होणाऱया सात तलावांमध्ये सध्या जोरदार पाऊस होत असल्यामुळे 8 टक्क्यांपर्यंत खाली आलेला जलसाठा आता 10.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. यातच पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक वापरासाठी उपयुक्त ठरणारे पवई तलाव आज ओव्हरफ्लो झाले.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी सातही तलाव ओसंडून वाहणे गरजेचे आहे. हे तलाव ओव्हरफ्लो झाले नाहीत तर मुंबईवर पाणीकपातीचे संकट येऊ शकते. मात्र सद्यस्थितीत पडणारा पाऊस पाहता या वर्षीदेखील सातही तलाव वेळेत तुडुंब होतील अशी आशा आहे.