तीन अधिकाऱ्यांना कामावरून काढले, अहमदाबाद विमान अपघात

तब्बल 270 जणांचे बळी घेणाऱया अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या प्रकरणात पहिली कारवाई करण्यात आली आहे. प्रवासी सुरक्षेतील त्रुटींना जबाबदार धरत तीन अधिकाऱयांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश नागरी उड्डाण महासंचालनालयाने एअर इंडियाला दिले आहेत. एअर इंडियाने या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली आहे.

कारवाईचा हातोडा पडलेल्या अधिकाऱयांमध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, मुख्य व्यवस्थापक (क्रू शेडय़ुलिंग) पिंकी मित्तल आणि क्रू शेडय़ुलिंग प्लॅनिंग करणाऱया पायल अरोरा यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱयांच्या विरोधात अंतर्गत शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू करावी तसेच नेमकी काय कारवाई केली यासंदर्भातील अहवाल 10 दिवसांत सादर करावा, असे आदेशही डीजीसीएने एअर इंडियाला दिले आहेत.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार 12 जून रोजी विमान अपघात झाल्यानंतर लगेच डीजीसीएने हे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्ष कारवाईची माहिती आता समोर आली आहे. एअर इंडियाने शनिवारी यासंदर्भात निवेदनही प्रसिद्ध केले आहे. ‘‘डीजीसीएच्या आदेशाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे. जबाबदार अधिकाऱयांवरील कारवाईनंतर आता पंपनीचे मुख्य ऑपरेशन्स अधिकारी इंटिग्रेटेड ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (IOCC) वर थेट लक्ष ठेवून राहतील. सुरक्षेचे सर्व नियम, संकेत आणि मानकांचे काटेकोर पालन करण्यास एअर इंडिया कटिबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या एआय-171 विमानाला 12 जून रोजी अपघात झाला होता. यात विमानातील 242पैकी 241 प्रवाशांचा तर विमान जिथे कोसळले त्या वैद्यकीय महाविद्यालयातील 29 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर एअर इंडियाच्या कारभारावर विशेषतः सुरक्षा उपायांवर डीजीसीए करडी नजर ठेवून आहे.