विधानसभा निवडणूक मतदान घोळाची सुनावणी पूर्ण, हायकोर्ट 25 जूनला निकाल देणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पूर्ण झाली. सुनावणीच्या अंतिम दिवशीही अ‍ॅड. आंबेडकर यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यांच्या युक्तीवादाची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि याबाबत 25 जून रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. याचिकेवर न्यायालय कोणता निर्णय देतेय, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाखांहून अधिक मतदान झाले, असा आरोप ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयात केला होता. याबाबत विक्रोळी येथील रहिवासी चेतन अहिरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी अंतिम सुनावणी झाली. युक्तीवादासह प्रतिवादी निवडणूक आयोग व सरकारची बाजू ऐकून घेत न्यायालयाने ही सुनावणी पूर्ण करत अंतिम निकाल राखून ठेवला आहे.

सुनावणीत ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केला. आंबेडकर यांच्या दाव्याची खंडपीठाने नोंद घेतली. मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी 76 लाखांहून अधिक मतदान झाले. 288 मतदारसंघांपैकी 19 जागांवर घोषित मतांपेक्षा जास्त मतदान झाले, तर 76 जागांवर कमी मतदान नोंद झाले, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

खंडपीठाने याप्रकरणी फेब्रुवारीत झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीसही बजावली होती. संपूर्ण विधानसभा निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.