
लंडनहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विमानातील पाच प्रवासी आणि दोन केबिन क्रू अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बेशुद्ध पडले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. विमानाचे मुंबईत सुरक्षित लँडिंग केल्यानंतर तत्काळ प्रवाशी आणि केबिन व्रूंची वैद्यकीय तपासणी करून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने निवेदनाद्वारे दिली आहे.
बिघाडाची मालिका सुरूच
एअर इंडिया, इंडिगोसह विविध विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची मालिका अद्याप सुरूच आहे. त्यामुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागत असल्याचे चित्र आहे. आज एअर इंडिया एक्स्प्रेसची दोन विमाने आणि इंडिगोच्या एका विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. जयपूर-दुबई विमानाच्या कॉकपिटमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे 130 प्रवाशांना घेऊन जाणारे उड्डाण रद्द करावे लागले, तर श्रीनगरला जाणारे विमान लँडिंग न होताच नवी दिल्लीला परतले.
z इंदूरमधून भुवनेश्वरला निघालेले इंडिगोचे विमान इच्छित स्थळी पोहोचलेच नाही. इंडिगोचे फ्लाइट 6ई6332 हे विमान तांत्रिक बिघाडामुळे मधूनच परत आले.