
संसद आणि राज्याच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज दांडी मारली. माळेगाव सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी बारामतीवर लक्ष्य केंद्रीय केले आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीकडे अजित पवार यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. आर्थिक काटकसर आणि वित्तीय सुधारणांच्या संदर्भात महत्त्वाच्या परिषदेला वित्त मंत्र्यांनी उपस्थित राहाणे अत्यंत आवश्यक असते. पण तरीही वित्त मंत्री गायब होते.
विधान भवनातील सभागृहात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला आजपासून सुरुवात झाली. या परिषदेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, लोकसभेच्या अंदाज समितीचे प्रमुख डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांची उपस्थिती असल्याने संपूर्ण राजशिष्टाचार पाळण्यात आला होता. पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांची उद्घाटन सोहळ्यात अनुपस्थिती सर्वांनाच खटकत होती. वित्त खाते आणि काटकसरीच्या दृष्टीने या बैठकीत माहितीचे आदान-प्रदान होते. खर्च कपातीच्या सूचना केल्या जातात. पण तरीही अशा महत्त्वाच्या बैठकीला वित्त मंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवल्याची विधान भवनात चर्चा होती. मात्र संध्याकाळी अजित पवार मंत्रालयातील दालनात होते असे सांगण्यात येते.
मराठीला डावलले
महाराष्ट्र विधान भवनात अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे. मात्र यावेळी विधिमंडळाला मराठीचा विसर पडल्याचे सभागृहात लावण्यात आलेल्या हिंदी व इंग्रजी भाषेतील फलकावरून दिसून आले. राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा गाजत असतानाच बॅनरवर फक्त हिंदी व इंग्रजी भाषेचा उपयोग करून अंदाज समितीच्या कामकाजात मराठीला डावलण्यात आले. केंद्राचे त्रिभाषा सूत्री धोरण आहे. मग मराठी राज्यभाषा असूनही तिला का वगळण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चांदीचे ताट आणि राजेशाही थाट
या परिषदेला आलेल्या व्हीव्हीआयपींसाठी विधान भवनाच्या हिरवळीवर विशाल महाकाय मंडप उभारण्यात आला आहे. व्हीव्हीआयपींसाठी चांदीच्या ताटात राजेशाही जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. एकदम शाही खाना होता. एका ताटाची किंमत सहा हजार रुपये होती अशी रंगतदार चर्चा विधान भवनाच्या हिरवळीवर होती. अंदाज समितीच्या बैठकीत वित्तीय खर्चावर आणि खर्च नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या जातात. पण मंडप काही कोटी रुपयांचा होता. या राष्ट्रीय परिषदेत जेवणासाठी काही लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची चर्चा असून या परिषदेला दिल्लीतून आलेल्या पत्रकारांची व्यवस्था ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे.