बेकायदा शाळांविरोधात दिव्यातील 2019 अधिकृत शाळांचा बेमुदत बंद, पालिका शिक्षण विभाग-पोलिसांची कारवाईसाठी चालढकल

बेकायदा बांधकामांबरोबरच दिवा शहरात बेकायदा शाळांचे पीक दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या शाळांची संख्या 69 वर जाऊन पोहोचली आहे. वारंवार अर्ज-विनंती-आंदोलने करूनही अनधिकृत शाळांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अखेर बेकायदा शाळांविरोधात 19 अधिकृत शाळांनी ‘बंद’चे हत्यार उपसले आहे. बेकायदा सर्व शाळा कायमच्या बंद कराव्यात या मागणीसाठी 1 जुलैपासून दिव्यातील अधिकृत शाळांनी ‘बेमुदत बंद’ची हाक दिली आहे.

गेल्या चार वर्षांपासून दिव्यातील बेकायदा शाळांविरोधात संघर्ष सुरू असून बेकायदा शाळांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अधिकृत शाळा संचालकांनी जवळपास 40 ते 45 वेळा पत्रव्यवहार करूनही शिक्षण विभागाला जाग येत नसल्याने आता शाळाच बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ शिक्षण विभागाच्या आशीर्वादामुळे या बेकायदा शाळा बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यामुळे बेकायदा शाळांसोबत दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अधिकृत शाळा संचालकांनी केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या 29 शाळा सुरूच
दिव्यातील बेकायदा शाळेत घुसून एका विकृताने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर येताच खडबडून जाग आलेल्या शिक्षण विभागाने दिव्यातील 29 बेकायदा शाळांना नोटिसा बजावत गुन्हे दाखल केले होते. मात्र त्यानंतरही या बेकायदा शाळा संचालकांनी सर्व नियम धाब्यावर बसवत या शाळा सुरूच ठेवल्या आहेत.

अधिकृत शाळांमधील शिक्षकांवर सरकारने शासकीय कामांचा भार वाढवला आहे. त्यामुळे शिक्षक आणि संचालक आधीच त्रस्त आहेत. त्यात बेकायदा शाळांमुळे अधिकृत शालेय विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार व इतर सुविधा पुरवायच्या कशा, असा प्रश्न अधिकृत शाळा संचालकांसमोर उभा राहिला आहे. दिव्यात बेकायदा शाळांची संख्या झपाट्याने वाढण्याचे नेमके कारण काय याचा उलगडा होणे गरजेचे आहे. उत्तम सावंत (खजिनदार, इंडिपेंडेट स्कूल मॅनेजमेंट संघटना)