भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90 हजार विद्यार्थी नापास, द्रमुक मंत्र्यांचा दावा

भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90 हजारहून अधिक विद्यार्थी नापास झाले असा दावा तमिळनाडूतील द्रमुकचे मंत्री अन्बिल महेश पोय्यमोळी यांनी केला आहे. पोय्यमोळी हे तमिळनाडूचे शिक्षणमंत्री असून एका शालेय स्पर्धेदरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.

अन्बिल पोय्यमोळी म्हणाले की, भाषेचे शिक्षण हे विद्यार्थ्यांची पसंती असावी. “तिसरी भाषा ही एक पर्याय असावा, त्याचे बंधन नसावे,” तसेच शैक्षणिक धोरणात लवचिकतेची गरज असावी असेही पोय्यमोळी म्हणाले.

केंद्र सरकार तामिळनाडू आणि केरळसारख्या चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेला निधी रोखत आहे असेही अन्बिल पोय्यमोळी म्हणाले. तसेच केंद्र सरकार शिक्षणाचा निधी रोखून राज्यांना धमकावत आहे. पण शिक्षणावरचा खर्च राज्य सरकार करणार असे आश्वासन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिले आहे असेही पोय्यमोळी म्हणाले.