जनसुरक्षा विधेयक आणलं तर रस्त्यावर उतरू, सरकारला गुडघ्यावर आणू! – उद्धव ठाकरे

जनसुरक्षा विधेयक आणलं तर रस्त्यावर उतरू, उद्धव ठाकरे असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच नक्षलवादी म्हणत भाजपने शेतकऱ्यांची संभावना केली, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबईतील आझाद मैदानावर माकपने जनसुरक्षा विधेयकाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्व देशभक्त बांधवांनो भगिनीन आणि मातांनो. मी मुद्दाम म्हणून देशभक्त हा शब्द वापरलाय याचं कारण या सरकारला असं वाटतंय की जो कोणी सरकार आणि विशेषतः भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे. यांना कल्पना नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचा काही संबंध नव्हता. आणि आता दुर्देवाने म्हणा कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने हे निवडून आले हे त्यांना सुद्धा कळलेल नाहीये. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळेला 400 पार करायला निघाले होते पण आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये यांच उधळलेल गाढव होत ते रोखलं. त्याच्यानंतर मात्र विधानसभेत त्यांनी काय अशा चाली खेळल्या की अचानक सहा महिन्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं. आपल्याला सगळ्यांना एक धक्का होताच की असं कसं झालं आणि मला कल्पना आहे की आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या सोबत होतात. आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण सुद्धा प्रचार केला होता आणि हेच त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतंय. आता मला आठवण करून दिली की आपलं सरकार येण्याच्या आधी कधीच 2017-18 नाशिक मधून उत्तर महाराष्ट्रातून हजारो लाखो शेतकरी हे मुंबईमध्ये येत होते. मुंबईच्या वेशीवरती ठाण्याच्या वेशीवरती शिवसेनेचे सगळे मी नेते पाठवले होते, आदित्यही होता. त्या शेतकऱ्यांना हातामध्ये लाल बावटा होता. मला विचारलं की तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख यांच्या हातात लाल बावटा आहे मग तुम्ही कसे काय यांच्याशी बोलताय. मी म्हटलं असेल त्यांच्या हातात लाल बावटा, पण गोरगरीब शेतकरी जेव्हा अनवाणी माझ्या मुंबईत येतोय, शेकडो मैल पायी चालत चालत येतोय, त्याचे पाय हे रक्तबंबाळ झाले. त्याच्या हातात लाल बावटा आहे पण त्याच्या पायातन निघालेल रक्त सुद्धा लाल आहे. त्या रक्ताशी माझी बांधिलकी आहे ही आपली भूमिका होती. पण तेव्हाही त्या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणत भाजपच्या लोकांनी केलं संभावना केली होती. आता ते जनसुरक्षा काहीतरी बिल आणताय, त्यात देशामध्ये तुमचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना तुम्ही तुरुंगत टाकण्याची जर का स्वप्न बघत असाल तर प्रथम पहलगाम मध्ये आलेले जे अतिरेके होते ते अतिरेकी गेले कुठे याचं उत्तर कोण देतय? कारण साधारणतः आता अस समज झालाय की जे भाजपमध्ये जातील ते साधुसंत आहे आणि भाजपच्या विरोधात बोलतील ते देशद्रोही आहेत. म्हणून मी एक प्रश्न विचारला होता की अतिरिकी सापडत कसे नाहीत. कुठे पातळात गेले आकाशात गेले की भाजपात गेले. भाजपात गेले की सर्व माफ. पण भाजपात नसेल तर तो सज्जन असला तरी तो नक्षलवादी आहे, ही सत्तेची मस्ती आपण चालू द्यायची नाहीये. आणीबाणीला 50 वर्ष झाली म्हणून त्या सगळ्या काल आठवणी सगळे सांगत होते. पण आता गेली 11 अघोषित आणीबाणी आहे तिचं काय करणार? कोण लढणार तिच्या विरुद्ध. इंदिरा गांधींनी जाहीर करून आणीबाणी लावली होती. यांची अघोषित आणीबाणी आहे. या अघोषित आणीबाणी विरुद्ध आपण लढणार आहोत. आपण लढणार असाल तर शिवसेना तुमच्या सोबत आहे, त्यांच्याकडे आज पाशवी बहुमत आहे.
गेल्या आठवड्यात उलकाताई आणि सगळे सहकारी हे मला भेटायला आले होते. या अधिवेशनामध्ये ते हे विधेयक आणू इच्छित आहेत. प्रचंड पाशवी बहुमत त्यांच्याकडे आहे. पण सभागृहात बहुमत जरी त्यांचं असलं तरी रस्त्यावरती सत्ता ही आपली आहे. कालच एक प्रचंड मोठा दणका या सत्ताधाऱ्यांनाआपण दिलेला आहे.

तसेच आम्हाला हिंदी भाषेचा विरोध नाहीये, पण हिंदीची सक्ती मात्र आम्ही आमच्या माथी मारून देणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. सक्तीची भाषा कराल तर आम्ही तोडून मोडून टाकू आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गावागावामध्ये त्या जीआर ची होळी केली तसेच तुमच्या वतीने सांगतोय की हे विधेयक आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा पाप किंवा स्वप्न बघू नका. हे विधेयक एक तर आणू नका आणि आणलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या विधेयकाला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सत्तांध जरूर असाल, पण सत्तांध जसं एखादा हत्ती मदांध झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर बसलेला तो मानेवर बसलेला माणूस अंकुश मारतो. जर भाजप सत्तांध झाली असेल तर त्याच्या डोक्यावरती प्रहार करायला महाराष्ट्रातला अंकुश हा माझा गोरगरीब सगळा मराठमोळा मावळा आहे तो तयार आहे. याच्या शक्तीची परीक्षा घेण्याचा धाडस करू नका, गुण्या गोविंदाने तुम्हाला तुम्ही जे काही बहुमत ज्या कोणत्या मार्गाने मिळवला असेल ते उपभोगा. भ्रष्टाचार करू नका. लोकांना गोर गरिबाने छळू नका नाहीतर मग तुमच्या विरुद्ध कोणी उठवायचाच नाही. आवाज उठवला की घाल तुरुंगात. पण असं जर का करायला लागलं तर तुरुंग कमी पडतील. पण तुम्ही आमचा आवाज दाबू शकणार नाही. आणि एक दिवस असाच येईल की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र जसं काल हिंदी शक्तीच्या विरोधात मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला आणि सरकारला गुडघ्यावरती आणलं तसंच जर का हे विधेयक आणलं तर आजच सांगतो सगळ्या पक्षांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनी एकत्र आणून या सरकारला गुडघ्यावर आपल्याला आणावच लागेल आणि त्याच्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे. आपण एकजुटीने इकडे आलात, ही एकजुट महत्वाची आहे. तोडा फोडा आणि राज्य करा, विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जी काही घोषणा दिली होती बटेंगे तो कटेंगे. आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमान करतायत. पण त्यांनी बटेंगेमध्ये मराठा मराठेतर केलं, जातीपातीत, धर्मामध्ये आपल्याला विखरून टाकलं आणि आता हे चांगलं सुखाने व तिकडे राज्य करतायत. ज्या ज्या वेळेला असं वाटतं की आपली जनता विखुरलेली आहे त्या त्या वेळेला जो सत्ताधारी असतो त्याचा हुकुमशाह होतो. म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की आजच हे आंदोलन किंवा धरणं हे केवळ आणि केवळ या एका प्रसंगापुरत मर्यादित ठेवू नका. उद्या त्यांनी जर का विधेयक आणलं तर विधेयकामध्ये मी माझे दोन्ही सभागृहाचे सगळे आमदार आणलेत भास्करराव आहेत तिकडे आदित्य आहे. अनिल आहेत राखीताई सगळे सगळे बसलेले आहेत. माझे विधानसभेतले आमदार इकडे आहेत, सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील. पण पाशवी बहुमताच्या आधाराने जर का त्यांनी हे विधेयक मंजूर केलं तर मग मात्र आपल्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावर यावं लागेल. ही लढाई रस्त्यावर लढावी लागेल आणि त्याची तयारी ही आजपासून तुम्ही सुरू करा. जिंकेपर्यंत थांबायचं नाही. तोपर्यना तुटणार नाही फुटणार नाही आणि हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.