
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सोमवारपासून (दि. 11) दोन दिवसांची संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. या कालावधीत ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती व श्री कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून दर्शन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूळ मूर्ती सुस्थितीत राहावी, यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करण्यासंदर्भात वेळोवेळी कळविण्यात आले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, नवी दिल्ली यांच्याकडून मूर्तीची पाहणी व संवर्धन 16 एप्रिल 2024 मध्ये करण्यात आले होते.
त्यावेळी दिलेल्या सूचनेनुसार देवस्थान व्यवस्थापन समितीकडून याबाबतचे पत्र दि. 12/06/2025 रोजी महासंचालक भारतीय पुरातत्व विभाग, नवी दिल्ली यांना पाठवून मूर्तीची नियमित पाहणी व आवश्यक संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत कळवले होते. त्यानुसार पुरातत्व विभाग यांच्या वतीने श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी व आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया सोमवार दि. 11/08/2025 पासून ते 12/08/2025 अखेर करण्यात येणार आहे.