आंबा घाटात दरड कोसळली; वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन

साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे शुक्रवारी सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दरड कोसळत असल्याने रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे सकाळपासूनच दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्त्याचा काही भाग वाहनांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.