
प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. साहित्यातील योगदानासाठी त्यांना सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. तसेच सरस्वती सन्मानही त्यांना मिळाला होता. म्हैसूरमध्ये ते कुटुंबासोबत राहत होते आणि निवृत्त जीवन जगत होते. वृद्धापकाळामुळे ते काही काळापासून आजारी होते आणि बुधवारी त्यांनी बंगळुरुतील राष्ट्रोथाना हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
एस. एल. भैरप्पा हे कन्नडमधील एक प्रमुख कादंबरीकार, तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यांच्या कादंबऱ्या अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यांचे साहित्य नव्या पिढीतील तरुणांनाही भरुळ पाडते. तसेच त्यांचे साहित्य आजही अनेक तरुणांना वाचनाची प्रेरणा देतात. साहित्यातील योगदानासाठी त्यांना सरस्वती सन्मान (२०१०), केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (१९७५), पद्मभूषण (२०२३) यांसारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.
संतशिवर लिंगण्णय्या भैरप्पा यांचा जन्म २६ जुलै १९३४ रोजी हसन जिल्ह्यातील चन्नरायपट्टण तालुक्यातील संतशिवर गावात झाला होता. ते आधुनिक कन्नड साहित्यातील प्रमुख कादंबरीकारांपैकी एक आहेत. त्यांच्या कृतींमध्ये तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि मानवी भावनांचा समावेश असतो. त्यांची अनेक पुस्तके हिंदी, मराठी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत.