
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सोमवारी घडलेल्या एका अपघाताने मानवी संवेदनांचा भयंकर तुटवडा किती वाढलाय याचेच जिवंत उदाहरण समोर आणलं. मच्छी घेऊन जाणारा एक ट्रक सकाळी अंदाजे आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उलटला आणि यात चालक गंभीर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकलेला होता. मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकांनी मात्र ट्रकमधून बाहेर पडलेली मच्छी लुटून नेली.
अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव मोहम्मद अशफाक पी (42, केरळ) आहे. कुलाब्यातून केरळकडे जाणारा हा मच्छीवाहू ट्रक परशुराम घाट चढत असताना वाहनाचे नियंत्रण सुटल्याने तो कडेला पलटी झाला. धडाक्याचा आवाज होताच परिसरातील वाहने थांबली, गर्दीही जमली, पण मदत करण्यापेक्षा हातात थेट मच्छी घेऊन धावणारे लोक जास्त दिसत होते.
चालक आतमध्ये अडकून वेदनेने आरडाओरडा करत असताना बाहेरच्या नागरिकांनी पापलेट, बांगडा, सुरमई अशा 5 ते 10 किलो वजनाच्या मच्छीच्या पेटय़ा हिसकावून नेण्याची स्पर्धाच लावली. काहींनी दोन हातात भराभर पिशव्या भरल्या, तर काहींनी थेट वाहनात टाकून पसार झाले. या संपूर्ण प्रकारचा काही क्षणांत व्हिडीओसुद्धा काढला गेला.
या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालकाला नंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र, या घटनेत सर्वाधिक खटकणारी बाब म्हणजे, जखमी माणसापेक्षा मच्छीला अधिक महत्त्व देणारा निर्ढावलेपणा दिसून आला. परशुराम घाटातील या घटनाक्रमामुळे “मानवीपणा नेमका कुठे हरवला?’’ असा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.





























































