
डाळींबाची आवक कमी झाल्यामुळे डाळिंबाच्या भावात प्रचंड वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकर्याच्या डाळिंबाला बाजारात विक्रमी भाव मिळत आहे. गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात किलोस तब्बल ६०० रुपये भाव मिळाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सातारा येथून आलेल्या ३६ किलो डाळिंबाला किलोस ६०० रुपये, तर ७८ किलो डाळिंबाला किलोस ४०० रुपये असा भाव मिळाला.
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात दोन महिन्यांपूर्वी दररोज ५० ते ६० टन डाळिंबाची आवक होत होती. मात्र सध्या ही आवक घटून २५ ते ३० टनांपर्यंत आली आहे. आवक जास्त असताना डाळिंबाला किलोस १०० ते २५० रुपये भाव मिळत होता. आता मात्र आवक घटल्याने हा भाव १८० ते थेट ६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हा भाव फळाचा आकार, दर्जावर अवलंबून आहे. मार्केटयार्ड फळबाजारातील गाळा क्रमांक ६९८ येथील व्यापारी रावसाहेब कुंजीर यांच्या गाळ्यावर झाली. या डाळिंबाची खरेदी व्यापारी धनराज मोटे यांनी केली.
यंदा लवकर पावसाला सुरुवात झाल्याचा परिणाम डाळिंबाच्या फुलांवर झाला. फुलांचे प्रमाण कमी राहिल्याने फळधारणाही घटली. परिणामी बाजारात डाळिंबाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. मे–जूनपर्यंत तुरळक आवक राहणार असून, त्यानंतर नव्या हंगामातच आवक वाढण्याची शक्यता आहे. – प्रकाश बडदे, डाळिंबाचे व्यापारी, मार्केटटयार्ड.
उत्पादन घटले, दर मात्र दुप्पट
अडीच ते तीन एकर क्षेत्रात सुमारे १,००० डाळिंबाची झाडे आहेत. गेल्या वर्षी सुमारे ३० टन उत्पादन मिळाले होते. मात्र यंदा केवळ १० टन उत्पादन हाती आले. गेल्या वर्षी सरासरी ३०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. यंदा मात्र दर थेट ६०० रुपयांपर्यंत गेल्याने समाधान आहे. – सचिन देवकर, शेतकरी, माण तालुका, जिल्हा सातारा























































