चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसू.. जेद्दाहमध्ये अडकलेले 200 हिंदुस्थानी मायदेशी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती राष्ट्रांना लक्ष्य करून इराणच्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियात सुरू असलेल्या अशांततेदरम्यान जेद्दाहहून सुमारे २०० प्रवाशांना घेऊन जाणारे एक विशेष विमान अहमदाबादमध्ये उतरले. भीती आणि दहशतीत रात्र घालवल्यानंतर कुटुंबे पुन्हा एकत्र आल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आनंदाचे दृश्ये दिसून आले. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हास्य ठेवून, कुटुंबातील सदस्यांनी पोहोचल्यावर एकमेकांना मिठी मारली. ३ मार्चला सकाळी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जेद्दाहला निघालेले इंडिगोचे विमान रात्री उशिरा परत आले, त्यात सुमारे २०० हिंदुस्थानी नागरिक होते.

‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये, एअरलाइनने घोषणा केली की, “सौदी अरेबिया आणि हिंदुस्थानामधील आमचे कामकाज हळूहळू सामान्य करत आहोत. दरम्यान, एअर इंडिया आणि एमिरेट्ससह इतर विमान कंपन्यांनीही आखाती राष्ट्रांमधून हिंदुस्थानी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी, एअर इंडियाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशांचे आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. दुबई विमानतळाने देखील पुष्टी केली की, २ मार्चला संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर मर्यादित कामकाज पुन्हा सुरू झाले.

२८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या समन्वित हल्ल्यांनंतर हवाई वाहतूकीवर निर्बंध आले. त्यानंतर तेहरानने आखाती राष्ट्रांवर हल्ले सुरू केले, त्यांना “कायदेशीर लक्ष्य” असे संबोधले. त्यानंतर खऱ्या अर्थाने हा देश लष्करी संघर्षासाठी सज्ज झाला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विमान उड्डाणे रद्द झाली.