
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हिरक महोत्सव त्यांच्या हयातीत खेडमध्ये साजरा करण्यात आला होता. २३ एप्रिल १९५२ रोजी हा हिरक महोत्सव साजरा केल्याचे एक दुर्मिळ दस्तऐवज सापडला आहे.
१९५२ साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हिरक महोत्सव तत्कालीन खेड तालुका विद्यार्थी वसतिगृह मुंबई आणि खेड तालुका पंचायत कमिटी यांच्यावतीने मामलेदार कचेरी समोर साजरा झाला होता. हा इतिहास खेड तालुक्यातील रसाळगड येथील ॲड.संतोष सावंत यांनी शोधून काढला आहे. त्यांच्या हाती एक पत्र लागले आहे. ॲड.सावंत यांनी आमच्या पंच्याहत्तरी या स्मरणिकेतून या इतिहासाला उजाळा दिला आहे. १९५२ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिरक महोत्सव कार्यक्रमाला तत्कालीन आमदार भाऊसाहेब पाटणे उपस्थित होते. त्याकाळात समाजबांधवानी दीड हजारात साडे सहा गुंठे जमीन विकत घेण्याचा संकल्प केला होता. १४ एप्रिल निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी या इतिहासाला उजाळा मिळाला आहे.



























































