व्याज दर ‘जैसे थे’ राहणार की वाढणार, 5 जूनला RBI पतधोरण जाहीर करणार; महागाईने पिचलेल्या जनतेची धाकधूक वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण समितीची तीन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक बुधवारपासून सुरू झाली आहे. आखातातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. त्यामुळे देशात महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय समिती व्याजदर स्थिर ठेवणार की त्यात वाढ करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या बैठकीचा अंतिम निर्णय शुक्रवारी 5 जून रोजी जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती आरबीआयने दिली.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा 2 जून रोजी सकाळी 10 वाजता पतधोरण जाहीर करतील आणि दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडतील. यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयने मुख्य रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला होता. तसेच स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी 5 टक्के आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी 5.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता.

दरम्या, मधल्या काळात जागतिक पातळीवर अनेक नकारात्मक घडामोडी घडल्या आहेत. रुपयाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. परदेशी गुंतवणूकदार मार्केटमधून पैसा काढून घेत आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यात इंधनाचे दरही वाढवण्यात आले. त्यामुळे व्याज दर ‘जैसे थे’ राहणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून महागाईने पिचलेल्या जनतेची धाकधूक वाढली आहे.

रेपो रेट ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता

सध्याच्या परिस्थितीत आरबीआय व्याजदरात कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर वाढल्याने आधीच महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसत आहे. अशात व्याजदरात वाढ केली तर सर्वसामान्य जनतेवर आणखी बोझा वाढेल आणि सरकार विरोधात वातावरण तयार होईल. त्यामुळे रेपो रेट जैसे थे राहण्याची शक्यता आहे.