दोन भाऊ एकत्र येणार म्हणून भाजपने धास्ती घेतली, आदित्य ठाकरे यांची टीका

दोन भाऊ एकत्र येणार म्हणून भाजपने धास्ती घेतली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच दोन दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप आणि एसंशि गट किती प्रयत्न करत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

विधिमंडळाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तसे पाहिल्यास गेल्या दोन दिवसांमध्ये दोन आंदोलनं आणि सरकारचे दोन निर्णय झाले. पहिले आंदोलन आमचा इशारा आंदोलन होता. 25 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, कारण शालेय शिक्षण खात्याने अकरावी प्रवेशाचा घोळ या सरकारने घातला आहे. तेव्हा लगेच पहिली यादी लागली पण अजूनही त्यात घोळ आहे. आणि दुसरी म्हणजे पहिलीपासून सरकार हिंदीची सक्ती करणार होते, त्याविरोधात संपूर्ण मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता. आणि मुख्यमंत्र्यांना जी आर रद्द करावा लागला. आम्ही अजूनही लेखी आदेशाची वाट पाहत आहोत कारण यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेला माहित आहे. तरीही कालचा विजय मोठा आहे. मराठी माणूस एकवटला आणि महाराष्ट्राची ताकद कळाली तर काय चमत्कार घडू शकतो हे या निमित्ताने दिसले आहे.

तसेच दोन भाऊ एकत्र येणार म्हणून भाजपने धास्ती घेतली होती. दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप आणि एसंशिं गट किती प्रयत्न करत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. मराठी माणसाची एकजूट ही पाच तारखेला दिसणार होती, आणि ती एकजूट दिसावी, महाराष्ट्राची काय ताकद आहे हे दाखवण्याची आमची इच्छा आहे.