भाजप पर्यावरणाविरुद्ध का आहे, हा खरा प्रश्न आहे; ताडोबाजवळील खाणप्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. विकासाच्या नावाखाली भाजप पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका असून प्रदूषणात वाढ होत आहे. आता आदित्य ठाकरे यांनी घोडाझरीजवळील लोहारडोंगरी येथील खाण प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत याबाबत आवाज उठवला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करत प्रियांक चतुर्वेदी यांचा राज्यसभेतील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज @ShivSenaUBT_ च्या खासदार @priyankac19 जी ह्यांनी ताडोबा आणि घोडाझरी वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या खाण परवान्यांविरोधात राज्यसभेत आवाज उठवला. ह्यात महत्त्वाची बाब म्हणजे, होणारे नुकसान आणि सरकारी तिजोरीत होणारी भर ह्याची तुलना होऊ शकत नाहीच. पण भाजप इतके पर्यावरणाविरुद्ध का आहे, हा खरा प्रश्न आहे.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, हा एक महत्त्वाचा व्याघ्र कॉरिडॉर, वन्यजीव कॉरिडॉर आहे आणि त्यामुळे मानव-प्राणी संघर्ष (आणि वाघांशी संघर्ष) वाढेल, तरीही सरकारने ही योजना पुढे रेटली आहे. या खाणीतून केवळ १२० नोकऱ्या मिळणार आहेत, त्यापैकी फक्त ३२ कायमस्वरूपी असतील आणि १२ महिन्यांत उत्पादन केवळ १.१ दशलक्ष टन आहे. वन्यजीव आणि जंगलावर होणाऱ्या परिणाम भयंकर असतील, त्यामुळे याबाबत योग्य ती दखल घेण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या.

हा व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, यामुळे होणारे नुकसान आणि सरकारी तिजोरीत होणारी भर ह्याची तुलना होऊ शकत नाहीच. पण भाजप इतके पर्यावरणाविरुद्ध का आहे, हा खरा प्रश्न आहे, असे सांगत त्यांनी याबाबत पुन्हा एकदा आवाज उठवला आहे.