
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात केली आहे. 20 जूनपासून जुलैच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय मार्गांवर 15 टक्के उड्डाणे कमी असतील, असे एअर इंडियाने जाहीर केले. कंपनीने प्रवासी सुरक्षेसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
टाटा समूहाकडे मालकी असलेल्या एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय वाइड-बॉडी विमानांच्या उड्डाणांमध्ये कपात केली आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतरही अनेक बोईंग 787 ड्रीमलायनरमध्ये तांत्रिक बिघाड निदर्शनास आला. अशा बिघाडामुळे सहा दिवसांत एअर इंडियाची तब्बल 83 उड्डाणे रद्द करावी लागली. बिघाडाचे सत्र सुरु असल्याने बोईंग ड्रीमलायनरची तपासणी मोहीम व्यापक केली आहे. ही तपासणी पूर्ण होईपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात करण्याचे पाऊल एअर इंडियाने उचलले आहे. आखातातील इराण-इस्रायल युद्ध तसेच पाश्चिमात्त्य देशांकडे जाणाऱ्या विमान मार्गांवरील हवाई क्षेत्रात बंदी घालण्यात आल्याने विमान प्रवासाचा वेळ वाढला आहे. हीदेखील उड्डाणे कपातीमागील कारणे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आतापर्यंत 26 बोईंग विमानांची तपासणी पूर्ण
अहमदाबाद दुर्घटनेतून एअर इंडियाने प्रवासी सुरक्षेबाबत मोठा धडा मिळाला आहे. बोईंग विमानांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 33 पैकी 26 बोईंग विमानांची तपासणी केली असून उर्वरित विमानांवर काम सुरू आहे. एअर इंडियाकडे 33 बोईंग 787-8 आणि 787-9 विमाने आहेत. याबरोबरच आपल्या ताफ्यातील बोईंग 777 विमानांची अतिरिक्त सुरक्षा तपासणी करण्याचाही निर्णय कंपनीने घेतला आहे.