
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आणि यात 204 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच विमानातून भूमी चौहान ही महिला प्रवास करणार होती. पण दैव बलवत्तर म्हणून विमानतळावर पोहचायला तिला 10 मिनिटे उशीर झाला आणि तिचा जीव वाचला. ट्रॅफिकमुळे भूमी लेट झाल्याने त्यांचे फ्लाईट चुकले. गणपती बाप्पांनीच मला वाचवले, अशी प्रतिक्रिया भूमी यांनी दिली आहे.
भूमी चौहान या पतीसोबत लंडन येथे वास्तव्यास आहे. सध्या सुट्टीनिमित्त त्या अहमदाबादला आल्या होत्या आणि गुरुवारी त्या अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाने लंडनला परत जाणार होत्या. फ्लाईट पकडण्यासाठी भूमी घरातून निघाल्या. मात्र रस्त्यात खूप ट्रॅफिक असल्याने त्यांना विमानतळावर पोहचायला 10 मिनिटे उशीर झाला. यामुळे त्यांची फ्लाईट चुकली. यामुळे भूमी 1.30 वाजता परत घरी निघून गेल्या.
विमानाने 1.38 वाजता लंडनसाठी उड्डाण घेतले. मात्र उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमानतळापासून काही अंतरावर कोसळले. अवघ्या 10 मिनिटे उशीर झाल्याने फ्लाईट चुकलेली भूमी यातून चमत्कारीकरित्या बचावली. याबाबत भूमीने गणपती बाप्पाचे आभार मानले आहेत.
‘मी पूर्णपणे हादरून गेले आहे, मी नीट बोलूही शकत नाही. माझे संपूर्ण शरीर अक्षरशः थरथर कापत आहे. मला वाचवल्याबद्दल मी फक्त देवाचे आभार मानू इच्छिते. माझ्या गणपती बाप्पाने मला वाचवले’, असे भूमी यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले.