
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील पचमढी येथील त्यांच्या भेटीदरम्यान भाजप नेत्यांना असंवेदनशील, बेताल विधाने करणे टाळण्याचा सल्ला दिला. पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात खासदार आणि आमदारांना संबोधित करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. चुका एकदा होऊ शकतात,मात्र, त्याच चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले. वाणीवर संयम हा सर्वात महत्वाचे कौशल्य आहे, ते आत्मसात करत आधी झालेल्या चुका टाळण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी अलिकडेच केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजप चांगलाच अडचणीत आला होता. आता शाहा यांनीच अशा वक्तव्यांबाबत नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. अमित शाह यांनी नेत्यांना संवेदनशील किंवा वादग्रस्त बाबींवर भाष्य करण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा दिला आणि त्यांना आठवण करून दिली की त्यांच्यापैकी काहींनी भूतकाळात अशा चुका केल्या आहेत. शहा पुढे म्हणाले की, अनुशासनहीनता आणि बेशिस्त भाषणामुळे नेते आणि पक्षाची प्रतिमा दोन्ही खराब होते. वैयक्तिक आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी अनावश्यक मुद्द्यांवर मौन बाळगण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.