लेख – फडणवीस यांचा खोटारडेपणा

>> अतुल लोंढे

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपवाल्यांनी केलेली हेराफेरी, गडबड-घोटाळे, निवडणूक आयोगाची या निवडणूक प्रक्रियेतील संशयास्पद भूमिका याविषयी देशातील 11 वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून पर्दाफाश केला होता. गांधी यांच्या या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक लेख लिहून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु फडणवीस यांनी खोटय़ाचा आधार घेत दिलेले हे उत्तर राहुल यांच्या बिनतोड प्रश्नांसमोर निष्फळच ठरले. फडणवीस यांचा खोटारडेपणा उघड करणारा हा लेख.

मोदी काळात भारतातील निवडणुका व लोकशाही हा एक खेळखंडोबा बनला आहे. निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी ज्या भारतीय निवडणूक आयोगावर भारतीय संविधानाने सोपवली आहे, तेथूनच निवडणुका घोटाळय़ाची सुरुवात होत आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापासून ते मतदान, मतमोजणीपर्यंत निवडणूक आयोग ‘भाजप’च्या दबावाखाली सर्व निर्णय घेत आहे. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय प्रकर्षाने आला. या निवडणुकीत मतदार याद्यांपासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत भाजपने जी हेराफेरी केली, त्याबाबत संशयाचे बोट निवडणूक आयोगाकडेच उठले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील याच फेराफेरीचा, त्यात भाजपने केलेल्या घोटाळय़ांचा देशातील विविध 11 वृत्तपत्रांत लेख लिहून पर्दाफाश केला. गांधी यांनी त्यांच्या लेखात मांडलेल्या मुद्दय़ांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न भाजपच्या मंडळींनी केला खरा, परंतु राहुल यांनी मुद्दे टोकदार पद्धतीने मांडलेले असल्याने भाजपची सारवासारव निष्फळ ठरली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक लेख लिहून राहुल यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्याचा आव आणला. अर्थात राहुल यांचे मुद्दे अत्यंत बिनतोड असल्याने फडणवीस यांच्या लेखाची अवस्था ‘आला आणि गेला’ अशी दयनीय झाली. ना त्याची दखल कोणी घेतली ना त्यावर चर्चा झाली. राहुल यांच्या लेखामुळे गडबड-घोटाळे करून निवडणुका जिंकणाऱया भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला.

राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखात निवडणूक आयोग कशा पद्धतीने मोदी सरकारच्या दबावात काम करत आहे आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 82 विधानसभा मतदारसंघांतील 12 हजार बूथवर ज्या गडबडी झाल्या आहेत, त्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यांच्या लेखात त्यांनी खालील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न उपस्थित केले होते.

– 2024 ची लोकसभा आणि विधानसभा यांची मतदार यादी पूर्ण प्रकाशित करणे.
– फोटोसह असणारी ही मतदार यादी मशीन रिडेबल फाईल असावी.
– संध्याकाळी 5 वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हिडीओ फुटेज आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत.
– 82 विधानसभा मतदारसंघांत 12 हजार बूथवर 76 लाख मतदान झाले. म्हणजे एका बूथवर 600 मतदान झाले. एक मत नोंदवायला एका मिनिटाचा कालावधी गृहीत धरला तर हे मतदान पूर्ण व्हायला 10 तासांचा कालावधी लागला असेल, पण राज्यातील एकाही बूथवर पहाटेपर्यंत मतदान सुरू नव्हते. निवडणूक आयोगाने आम्हाला पहाटेपर्यंत मतदान सुरू असलेले एक तरी बूथ दाखवून द्यावे असे आमचे आव्हान आहे.

राहुल गांधी यांच्या लेखाला आयोगाने जे थातूरमातूर उत्तर दिले आहे, त्या उत्तरावर निवडणूक आयोगाच्या एकाही अधिकाऱ्याची सही नाही किंवा शिक्का नाही. ते उत्तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही नाही. त्यामुळे ते अधिकृत आहे का? यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी त्या अनधिकृत खुलाशाचा वापर करून मांडलेल्या तथ्यावरही प्रश्न निर्माण झाले आहे. देवेंद्रजींनी आपल्या लेखात पाच वाजेनंतर 16 लाख मतदान झाले असे चुकीचे सांगितले. प्रत्यक्षात 76 लाख मतदान झाले आहे. निवडणूक आयोगासह देशातील सर्व संविधानिक संस्थांवर मोदी सरकारचा कोणताही दबाव नसून त्या स्वतंत्रपणे काम करत आहेत हा दावा फडणवीसांनी केला आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पंतप्रधान व विरोधी पक्षनेते यांची समिती बनवली होती. मोदी सरकारने लोकसभेत बिल मांडून त्या समितीतून ‘सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांऐवजी पंतप्रधान नेमतील तो कॅबिनेट मंत्री’ असा लोकशाही संपुष्टात आणणारा निर्णय का घेतला? याचे उत्तर फडणवीसांनी आपल्या लेखात का दिले नाही?

दुसरे ढळढळीत उदाहरण म्हणजे भाजपने ज्यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले ते अजित पवार, महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली ज्यांना अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले ते छगन भुजबळ, अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीचा पार्टनर असल्याचे आरोप करून ज्यांच्यावर ईडीने धाडी घातल्या ते प्रफुल्ल पटेल, साखर कारखाना घोटाळ्यात ज्यांच्यावर ईडीने धाडी घातल्या ते हसन मुश्रीफ, ज्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि गुन्ह्यांचा पाढा देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात वाचून दाखवला होता, ज्यांच्यावर शेल कंपन्यांमार्फत मनी लॉन्डरिंगचा आरोप किरीट सोमय्या सातत्याने करत होते ते नारायण राणे यांच्यासह अनेक नेते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय अशा संस्थांचा गैरवापर करून काही जणांना जेलमध्ये टाकले, नंतर त्यांच्याशी मांडवली करून त्यांना सत्तेत सोबत घेऊन मंत्रीपदे दिली, हे सत्य नाही का ?

आपल्या माहितीस्तव तिसरे उदाहरण चंदिगढ उच्च न्यायालयाने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दिवशीचे पाच वाजेनंतरचे व्हिडीओ फुटेज द्यावेत असा आदेश दिला असताना केंद्र सरकारने कायद्यात बदल ते व्हिडीओ फुटेज सार्वजनिक करण्यास बंदी घातली. सरकार याबाबतीत लपवाछपवी का करत आहे?

सरकारच्या स्वतःच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 18 वर्षांच्या वरील म्हणजे मतदान करू शकणारी लोकसंख्या 9 कोटी 54 लाख आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये 9 कोटी 70 लाख मतदार आहेत. हे 16 लाख वाढीव मतदार पुठून आले, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. गडबड घोटाळ्याचे महाराष्ट्रातील आणखी एक उदाहरण आवर्जून नमूद करावेसे वाटते ते म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघाची मतदार यादी ‘डी डुप्लिकेशन’ सॉफ्टवेअरमधून तपासली असता हजारो मतदार असे सापडले आहेत, ज्यांचा epic नंबर वेगळा, पत्ता वेगळा, पण नाव मात्र एकच आहे. तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी ही गोष्ट मान्य केली, पण निवडणूक आयोग हे मान्य करायला तयार नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वेगवेगळ्या बूथवर एकाच व्यक्तीने अनेकदा मतदान केले आहे. (ऑसिटोन लावले की, शाई मिटते हे लक्षात ठेवावे.)

कदाचित वरील उदाहरणांवरून राहुल गांधी जे सांगताहेत ते सत्य आहे याची देवेंद्र फडणवीसांना खात्री पटेल व त्यांचे समाधान होईल, अशी आशा आहे. मुद्दय़ावर उत्तर देण्यापेक्षा शेरोशायरी करण्याचा गुण त्यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव पुमार यांच्याकडून घेतलेला दिसतो.

वरील उदाहरणांवरून हे सिद्ध होते की, संविधानिक स्वायत्त संस्थांची विश्वासार्हता 2014 नंतर कमी झालेली आहे. 2004 पासून आतापर्यंतच्या कोणत्याही विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेनंतर मतदानाच्या टक्केवारीत एक सव्वा टक्क्यापेक्षा धास्ती वाढ झाली नाही. मग याच निवडणुकीत आठ टक्के वाढ कशी झाली ? देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा, किसके चेहरे पे धुल है और कौन आईना साफ कर रहा है!

शेवटी आपण ‘जनतेने काँग्रेसला नाकारले आणि काँग्रेस जनतेला नाकारत आहे’, असा जो आरोप केला तो किती तकलादू आहे हे यावरून स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीत जनतेने तुमचा महाराष्ट्रात दारुण पराभव केला. त्यानंतर विधानसभेत तुम्ही जनतेचे मत चोरून घोटाळे करून सत्तेवर आला आहात. निकालानंतर जनतेत कुजबुज होती की, हे निवडूनच कसे येऊ शकतात? शेतकरी, तरुण, महिला असा एकही वर्ग तुमच्या कामावर समाधानी नव्हता. आम्ही यांना मत दिलेच नाही असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावातील ग्रमस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेऊन तुमचा पर्दाफाश करण्याचे ठरवले होते, पण तुम्ही दडपशाही करून लोकांचा आवाज दाबला. तिथेच तुम्ही निवडणूक चोरली आहे हे सिद्ध होते. मारकडवाडीच्या मातीने ठिणगी पेटवली आहे. अशाच जर निवडणुका चोरी होत राहिल्या तर मारकडवाडीच्या या ठिणगीचे राज्यभरात वणव्यात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही.

(लेखक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत.)