माणसाचा स्वार्थ आणि निसर्गाचे संवर्धन

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]

आज 21 व्या शतकात अत्याधुनिक सुखसोयीद्वारे मानव जीवन सज्ज झाले आहे. आपल्याला हवीहवीशी वाटणारी काँक्रिटची जंगले, वाहन, मोबाईल क्रांती, टॉवर, रसायनांचा वापर, खनिजांचा अतिवापर, जंक फूड, फॅशन, यांत्रिक संसाधने, प्लास्टिकचा वाढता वापर, प्राणघातक कचऱयात सातत्याने होणारी वाढ, वाढते प्रदूषण, अन्नभेसळ, भ्रष्टाचार, प्राण्यांची शिकार, जंगलतोड, जैवविविधतेचा ऱहास हे सर्व काही धोके निर्माण करून निसर्गाला संपवत आहेतच, सोबत आपल्या मानवी आयुष्यालादेखील कमकुवत करीत आहेत.

एकेकाळी पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून जाग येत असे, पण आता वाहनांच्या ध्वनिप्रदूषणामुळे जाग येते. वन्य प्राणी व मानव यातील संघर्ष वाढत चालला आहे. मौल्यवान खनिज साठे, दुर्मिळ वन्य जीव आणि औषधी वनस्पती पृथ्वीवरून झपाटय़ाने नष्ट होत आहेत. शहरातून वाहणाऱया नद्यांचे स्वरूप तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. निसर्गाच्या संगोपनासाठी स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रशासनाने नियम लावले आहेत, पण मोठय़ा प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

‘भारतीय वन सर्वेक्षण’च्या नोंदीनुसार, 2009 ते 2011 या कालावधीत देशात एपंदर 367 चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. हिंदुस्थानातील नैसर्गिक जंगले दरवर्षी 1.5 ते 2.7 टक्के या वेगाने घटत चालली आहेत. अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुसऱया बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. वर्ष 2000 पासून जगभरात प्रदूषणामुळे होणाऱया मृत्यूमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी 65 टक्के मृत्यू आशिया खंडात होत आहेत. वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, ग्लोबल वार्ंमग यामुळे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे दहा लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे ‘इंटरगव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अॅण्ड इकोसिस्टम सर्व्हिसेस’च्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील कायदेशीर वन्य जीव व्यापार अहवालानुसार, 2005 पासून आंतरराष्ट्रीय कायदेशीर वन्य जीव व्यापाराचे मूल्य 500 टक्क्यांनी आणि 1980 पासून 2000 टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे वन्य जिवांच्या जागतिक अवैध व्यापाराचे अंदाजे मूल्य दरवर्षी सुमारे 7-23 अब्ज डॉलर्स आहे, जे कायदेशीर बाजाराच्या मूल्याच्या जवळजवळ 25 टक्के आहे.

जगात सर्वात घातक प्राणी म्हणजे मानव आहे. आपल्या स्वार्थवृत्ती व लोभापोटी तो कुणाचेही अहित करायला घाबरत नाही. निसर्ग पूर्वीपासूनच मानवाला भरभरून आयुष्य आणि जीवनोपयोगी वस्तू देत आहे. प्रत्येक वस्तूच्या उत्पादनाकरिता लागणारा कच्चा मालदेखील निसर्गाद्वारे प्राप्त होतो, पण मानव आपल्या अधिकार व अपेक्षेपेक्षाही अधिक निसर्गाला लुटायला लागला आहे. मानव कल्याण व विकासासाठी प्रशासन, शिक्षण, कायदा, आयोग, संस्था, मतदान, पैसा, नाते व अनेक अत्याधुनिक सुखसोयीची साधने आहेत तरीही मानव कसल्या तरी समस्येने ग्रस्त होऊन समाधानासाठी भटकत असतो. शहरात नळाला एक दिवसदेखील पाणी नाही आले तर मानवाचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी मानवच पाण्याच्या सोयीसाठी दूर-दूरपर्यंत फेऱया मारतो, मग अशा परिस्थितीत वन्य जिवांची काय स्थिती होत असेल? विचार करून बघा की, वन्य प्राण्यांना समस्या असल्यास त्यांनी न्यायासाठी जायचे कुठे?

जागतिक बँकेचा अंदाज आहे की, 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुमारे 3.9 दशलक्ष चौरस मैल (दहा दशलक्ष चौरस किमी) जंगल नष्ट झाले आहे. गेल्या 25 वर्षांत जंगले 5,02,000 चौरस मैल (1.3 दशलक्ष चौरस किमी) कमी झाली – दक्षिण आफ्रिकेच्या आकारापेक्षा मोठे क्षेत्र. 2018 मध्ये ‘द गार्डियन’ने नोंदवले की, प्रत्येक सेपंदाला सॉकर मैदानाच्या आकाराच्या जंगलाचा एक भाग गमावला जातो. विकासाच्या नावावर हिरवळ भागातून झाडे कापून महामार्ग, पंपन्या, फार्महाऊस, हॉटेल्स तयार केली जात आहेत. यामुळे तेथील प्राणी अन्यत्र हलविण्यात येतात. परिणामी प्राण्यांची हालचाल रोखली जाते. त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या भोवती फिरायला सर्वांनाच आवडते, पण त्याचे संवर्धन करायला कुणालाच वेळ नाही.

दर काही दिवसांनी वर्तमानपत्रांतून वन्य प्राण्यांची शिकार, मृत वन्य प्राणी, संबंधित दुर्घटना व वन्य प्राण्यांद्वारे होणाऱया हल्ल्यांसंबंधी बातमी छापून येतच असतात. ‘कॉन्झर्वेशन लेन्सेस अॅण्ड वाइल्ड लाइफ’च्या अहवालातून असे सूचित होते की, 2021 च्या पहिल्या 81 दिवसांमध्ये 39 बंगाली वाघांनी आपला जीव गमावला तर अधिकृत सूत्रांनी 16 वाघांच्या मृत्यूची नोंद केली. कारणे – शारीरिक जखम, भुकेने, शिकार, निवासस्थान कमी होणे किंवा वेगवान वाहनांच्या धडकेने असे परिणाम आहेत. या यादीत महाराष्ट्र प्रमुख आहे आणि त्यानंतर मध्य प्रदेश राज्य आहे. 2019 मध्ये ब्राझीलमध्ये मानवाने पेटवलेल्या आगीची संख्या गगनाला भिडली. ऑगस्ट 2019 पर्यंत अमेझॉनमध्ये 80 हजारांपेक्षा जास्त आगी पेटल्या. 2018 च्या तुलनेत जवळपास 80 टक्के वाढ झाल्याचे नॅशनल जिओग्राफिकने म्हटले आहे. ‘जागतिक वन्य जीव गुन्हे अहवाल 2020’ पॅंगोलिन, पक्षी, कासव, वाघ, अस्वल आणि इतर वन्य प्रजातींच्या तस्करीच्या समस्येकडे लक्ष वेधतो. वन्य जिवांच्या तस्करीमुळे जगातील अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आपण वापरत असलेल्या औषधांपैकी 25 टक्क्यांहून अधिक औषधे रेनफॉरेस्ट वनस्पतींद्वारे तयार होतात. तरीही केवळ 1 टक्के रेनपह्रेस्ट वनस्पतींचा औषधी गुणधर्मांसाठी अभ्यास केला गेला आहे. जमिनीवर सरासरी 40 टक्के पाऊस हा वनस्पतींमधून बाष्पीभवनाने उद्भवतो. 2018 च्या एफएओच्या अहवालानुसार पृथ्वीच्या गोडय़ा पाण्यातील तीन चतुर्थांश पाणी जंगलातील पाणलोटातून येते आणि झाडांचे नुकसान पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतो.

हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रवासी पक्षी व इतर वन्य प्राणी जगभरात फिरतात, पण कधीही मार्ग विसरत नाहीत. पक्षी सुंदर नक्षीकाम केल्याप्रमाणे घरटी तयार करतात, प्रत्येक ऋतूचा अचूक अंदाज बांधतात. पक्षी, प्राण्यांना प्रशिक्षण दिले तर ते मानवापेक्षाही जास्त निष्ठावंत असतात. जास्त तर वन्य प्राणी समूह बनवून राहतात आणि समूहप्रमुखाच्या आज्ञेप्रमाणे वागतात आणि निसर्गाचे संगोपन करतात. वन्य जीव व पक्ष्यांद्वारे केलेली घाणसुद्धा निसर्गाकरिता वरदान सिद्ध होते. वन्य जीव आपापसात संवाद साधतात, एकमेकांच्या भावना समजून घेतात. खरं बघितले तर वन्य प्राणी आणि पक्ष्यांमुळेच जंगले निसर्ग समृद्ध होतात आणि मानवी जीवनाला चालना मिळते. जिथे निसर्ग समृद्ध असतो तिथे शुद्ध पाण्याचे व शुद्ध प्राणवायूचे स्रोत समृद्ध असतात. जीवजंतू, वनौषधी, वने समृद्ध असतात. मातीची सुपीकता टिकून राहते. गुणवत्तापूर्ण पीक तयार होते. अशा ठिकाणी रोगराई कमी आणि मानवाचे आयुष्मान मोठे असते. आनंददायी वातावरण व पौष्टिक अन्न मिळते. ग्लोबल वार्ंमगची समस्या कमी होऊन ओझोन थराचे संरक्षण वाढते. हवामानाचे चक्र सुरळीत चालते. मानव निसर्गाला न संपविता स्वतःच्या अस्तित्वाला संपवत आहे.