शिरीषायन – तुमसे अच्छा कौन है

>> शिरीष कणेकर

तुमच्या मते सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, सर्वात भारी संगीतकार कोण? काय पण प्रश्न विचारलाय? हे म्हणजे मधमाशांची अनेक पोवळे असलेल्या वृक्षावर दगड भिरकावण्यासारखं आहे. पार थोबाड सुजून निघेल. बोला, आहे हिंमत? प्रत्येक चित्रपट-संगीतप्रेमी आपापल्या लाडक्या संगीतकाराला कवटाळून बसलेला असतो. अनिल विश्वास, सी. रामचंद्र, मदन मोहन, नौशाद, ओ. पी. नय्यर, रोशन आणि शंकर-जयकिशन यांचे मठ आढळतात. आमचे नाही का, लता पंथीयांचे मेळावे आहेत. याचा अर्थ आशा भोसले, गीता दत्त, शमशाद, सुरय्या, खुर्शीद, नूरजहान, अमीरबाई कर्नाटकी, राजकुमारी, जोहराबाई, मीना कपूर, पारुल घोष, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, ललिता देऊलकर, सुलोचना कदम, उमादेवी, जगजीत काwर, बीनापानी मुखर्जी, संध्या मुखर्जी, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, वाणी जयराम, दिलराज काwर, अलका याज्ञिक व उषा मंगेशकर यांनी गाण्यासाठी तोंड उघडलं की, आम्ही थोडेच कानात बोटं घालून घेतो? आमचं एवढंच ठाम मत आहे की, लता ती लता. (माझा पह्टोग्राफर बंगाली मित्र म्हणाला होता – ‘लोटा इज लोटा!’) सॉरी टू से, लताच्या जवळपासही कोणी येत नाही. अमूक एक गाणं तू संध्या मुखर्जीकडून गाऊन घेतलं होतंस का, या प्रश्नावर उसळून संगीतकार सज्जाद हुसेन म्हणाला होता, ‘हम किसी संध्या या सुबह को नही जानते. हम सिर्फ लता से गवा लेते है मेरी काली कोयल!’
राजकीय पक्षांप्रमाणेच एकेका संगीतकाराचे अनुयायी आहेत. त्याच्या झेंडय़ाखाली ते मानवंदना द्यायला शिस्तीनं उभे असतात. अनिल विश्वासवाला दुसरं नावही ऐकायला तयार नसतो. नौशादवाले स्वतःला जाणकार व भारदस्त समजतात. मदन मोहन, सी. रामचंद्र, रोशन व सलील चौधरी यांचे भक्त ‘मेलडी’ची पूजा करतात. ओ.पी.चे दिवाने स्वतःला ठेकाप्रधान, ‘हटके’ म्हणवून घेतात.

‘तुम्ही ओ.पी.वाले का?’ लतानं एकदा मला हसत हसत विचारलं होतं.

‘अर्थात’ मी उत्तरलो. मी ओ.पी.ला माझ्या घरी दीड तास लता ऐकवली होती व ‘साली ऐसी आवाज सौ साल में नहीं होगी’ असं ओ. पी. कानाची पाळी पकडून म्हणाला, हे का कुणास ठाऊक लताला मी सांगितलं नाही. ओ.पी. व लता दोघांशी सख्य असलेला बहुधा मी एकमेव असेन. कदाचित आशा भोसले दुसरी!

मदन मोहनची ‘अनपढ’मधली ‘है इसी में प्यार की आबरू’ व ‘आपकी नजरों ने समझा’ ही लताची दोन गाणी माझ्या नावावर करा व बदल्यात माझं सगळं संगीत घेऊन टाका, असा डोंगराएवढा ‘कॉम्प्लिमेंट’ नौशादनं दिला होता.

एकदा अनिल विश्वासकडे रोशन गेला व साश्रू डोळय़ांनी म्हणाला, ‘अनिलदा, मी तुमच्यासारखं संगीत का देऊ शकत नाही?’

‘खुळा की काय तू.’ त्याची समजूत घालत अनिलदा म्हणाला, ‘अरे, तू अप्रतिम काम करतोयस. दोन कडव्यांमधली जोडणी तुझ्यासारखी कोणीच करू शकत नाही.’

‘मेहबुबा’तली चार गाणी रोशननं रेकॉर्ड केल्यावर रोशन ‘सेलेबल’ नाही हे कारण देऊन निर्माता-दिग्दर्शक के. अमरनाथ याने उर्वरित गाण्यांसाठी ओ. पी. नय्यरला आणले. ‘बावरे नैन’, ‘मल्हार’, ‘हम लोग’, ‘अनहोनी’, ‘नौबहार’, ‘रागरंग’, ‘बाराती’, ‘चांदनी चौक’, ‘टकसाल’, ‘आग्रा रोड’, ‘अजि बस शुक्रिया’, ‘बरसात की रात’, ‘आरती’, ‘दिल ही तो है’, ‘ताजमहाल’, ‘चित्रलेखा’, ‘भिगी रात’, ‘ममता’, ‘देवर’, ‘बहू बेगम’ व ‘नूरजहाँ’ या चित्रपटांचा संगीतकार ‘सेलेबल’ नव्हता? टेल मी अनदर जोक!

कुठल्या तरी एका संगीतकाराशी तुमच्या तारा जुळतात. मग बाकीचे तुम्हाला कमी वाटायला लागतात. नाही तर मला सांगा, नौशाद आणि सी. रामचंद्र, मदन मोहन आणि रोशन, अनिल विश्वास आणि हंसराज बहेल, एस. मोहिंदर आणि एन. दत्ता, श्यामसुंदर आणि के. दत्ता, एस. डी. बर्मन आणि सलील चौधरी, सरदार मलिक आणि खैय्याम, गुलाम महंमद आणि नौशाद, एस. मोहिंदर आणि विनोद, ओ. पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन यात उजवं-डावं कसं ठरविणार? शेवटी तुमची वैयक्तिक आवड हीच मोजपट्टी ठरते. विनोद पिंवा सज्जाद पिंवा श्यामसुंदर यांची मोजकी गाणी तुम्हाला देहभान विसरायला लावत असतील तर लाजबाब चालींची लयलूट करणाऱया हुस्नलाल-भगतराम पिंवा शंकर-जयकिशन यांना बाजूला सारणं हे अन्यायकारक आहे. विनोद (‘तारे वही है’ – ‘अनमोल रतन’), सज्जाद हुसेन (‘जाते हो तो जाओ’ – ‘खेल’), ‘श्यामसुंदर’ (‘साजन की गलिया’ – ‘बाजार’) कितीही प्राणप्रिय असून द्यात वर्षामागून वर्षे तुमच्यासमोर मदभऱया, आकर्षक, धुंदफुंद चालींचा खजिना रिता करणाऱया शंकर-जयकिशनपुढे नतमस्तक व्हा.
‘यादों की बारात’ या माझ्या पुस्तकात मी लिहिलं होतं (ज्यांना उधृत करावं अशा योग्यतेची माणसं आता राहिलीत कुठे?) ‘आमची पिढी डालडा, तुपावर, नेहरूंच्या शब्दांवर आणि शंकर-जयकिशनच्या गेय सुरांवर वाढली. दोन-तीन पिढय़ा वाढल्या. टिकाऊपणा, संख्याबळ व लोकप्रियता हे तीन निकष लावून पाहा. किती चित्रपट, किती गाणी, किती सातत्य. तुमसे अच्छा काwन है…

z [email protected]