प्रासंगिक : तोंडाचा कर्करोग – एक टाळता येण्याजोगे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील जवळ जवळ 70-80 टक्के तोंडाच्या कर्करोगाचे निदान आजार गंभीर टप्प्यावर पोहोचल्यावरच होते. भारतात तोंडाचा कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सर हा दुर्मिळ आजार नाही. कारण देशातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळ जवळ एक तृतीयांश प्रकरणे या प्रकारात मोडतात. आरोग्याच्या दृष्टीने ही एक मूकपणे बळावणारी आणीबाणीची परिस्थिती आहे, जी स्पष्टपणे दिसत असूनही दुर्लक्षित राहते. तपासणीदरम्यान नुसते पाहूनही सहज लक्षात येण्याजोगा आजार असूनही ओरल कॅन्सरच्या जवळ जवळ 70-80 टक्के प्रकरणांचे निदान तो गंभीर टप्प्यावर (तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर) पोहोचल्यावरच होते, तेव्हा पाच वर्षांच्या पुढे जगण्याच्या शक्यतेचा दर 30 टक्क्यांच्याही खाली येतो. सुरुवातीच्या टप्प्यावर निदान झालेल्या प्रकरणांमध्ये याच्या बरोबर उलट घडताना दिसते, जिथे आजारातून बचावण्याचे प्रमाण 80 टक्क्यांच्याही पुढे जाते. या आजाराच्या शोकांतिकेचे कारण उशिरा होणाऱ्या निदानामध्ये दडलेले आहे. रुग्णाला पहिली लक्षणे दिसू लागल्यावर तो कर्करोगावर उपचार करणाऱ्या विशेषीकृत केंद्रावर पोहोचण्यामध्ये सर्वसाधारणपणे तीन ते सहा महिन्यांचा काळ जातो. प्रारंभिक काळात तोंडाच्या आत उमटणारे व्रण हे बहुतेकदा वेदनारहित आणि आकाराने लहान असतात, तसेच त्यांच्याकडे सहजपणे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे एक सहज बरा होऊ शकण्याजोगा आजार तपासणीअभावी पुढच्या टप्प्यावर पोहोचतो.

हेड अॅण्ड नेक कॅन्सर इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे प्रमुख सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. सुलतान ए. प्रधान म्हणाले, ‘‘स्क्रिनिंग प्रोग्राम्स या आजाराची बाजी पलटवून टाकणारे सिद्ध झाले आहेत. तोंडाच्या तपासणीसाठीच्या सुसंघटित उपक्रमांमुळे कर्करोगपूर्व स्थितींचे लवकर निदान झाल्याने मृत्यूदर 24-30 टक्क्यांपर्यंत घटू शकतो. महाराष्ट्रामध्ये फिरती तपासणी पेंद्रे आणि सामुदायिक कर्करोग शिबिरे यातून अतिधोकादायक गटात मोडणारे व्रण कर्करोगात रूपांतरित होण्याआधीच ओळखले जात असल्याचा प्रभाव याआधीच दिसून आला आहे.’’

आपल्या देशात कर्करोगाची 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे तंबाखू सेवानाशी, विशेषतः गुटखा, खैनी आणि सुपारीसारख्या धूरविरहित तंबाखूशी जोडलेली आहेत. मद्यपानामुळे यातील धोका अनेक पटींनी वाढतो, तर HPV हे तुलनेने अधिक तरुण, तंबाखू न खाणाऱयांच्या बाबतीत चिंतेचा विषय म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्रात भारतातील ओरल कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. तोंडाचा कर्करोग हा राज्यातील पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे व स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या पाच कर्करोगांमध्ये आहे.

‘‘तोंडाचा कर्करोग हा अशा काही मोजक्या कर्करोगांपैकी एक आहे, जिथे लवकर झालेले निदान, तंत्रज्ञानाची मदत यांच्यामुळे आपण रोगाच्या परिणतीमध्ये खरोखरीच बदल घडवून आणू शकतो. मात्र जागरुकता असल्यास व रुग्णाला वेळीच उपचारासाठी पाठविले गेल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या कामी आमची मदत होऊ शकते,’’ असेही डॉ. सुलतान ए. प्रधान म्हणाले. ओरल कॅन्सर लवकरात लवकर दिसून आला तर तो एक टाळता येण्याजोगा व बरा होण्याजोगा आजार आहे. त्याची खरी किंमत केवळ उपचारांमधून नव्हे तर कृतीस होणाऱया विलंबातून भरावी लागते.