
>> सुधाकर वसईकर
अवघे 29 वयोमान असलेला चैतन्य कुलकर्णी ऊर्फ ‘शऊर’ (खेडवाला) हा एक उत्तम गझलकार म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर परिचित तर आहेच, पण वैशिष्टय़पूर्ण शेरांच्या सुंदर सादरीकरणाने त्याने अल्पावधीतच मराठी रसिकजनांची मनेही जिंकली आहेत. सामान्य रसिकांना लवकर रिलेट होणारा काव्य प्रकार म्हणजे गझल. चांगला गझलकार होण्यासाठी अगोदर चांगला कवी असणे गरजेचे असते. स्वयं प्रकाशनाने अलीकडेच ‘चैतन्यचाफा’ काव्यसंग्रह प्रकाशित केला असून सुरुवातीच्या काही सहजसोप्या, अर्थवाही कविता वाचल्यावर पुढील कविता वाचण्याची उत्सुकता वाढत जाते आणि कवितागणिक चैतन्य कुलकर्णी हा उत्तम कवी असल्याची प्रचिती येते. पहिलाच काव्यसंग्रह असून कुठेही नवखेपणा जाणवत नाही. काव्यसंग्रहातील अर्पणपत्रिका, मनोगत, ब्लर्ब लक्षवेधी आहेत. एखादा नवोदित कवी आपल्याच कवितेकडे तटस्थपणे कसा पाहतो आणि कसे पाहायला हवे याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे मनोगत होय. शिवाय स्वतबद्दल माहिती देताना त्यातील सच्चेपण उठून दिसते. चार ओळींच्या अर्पणपत्रिकेतूनच कविता चित्रमय पद्धतीने वाचकांसमोर उभी ठाकते.
सृजनाच्या बागेमध्ये
ही जादू रोज घडावी
कवितेतून चित्र झरावे
चित्राची कविता व्हावी
स्वानुभवातून आलेल्या कविता वैयक्तिक न वाटता वैश्विक अनुभव देतात. कवितानुभवाशी रसिक आपसूक जोडला जातो. ‘तीन मुली’, ‘वॉशरूम’, ‘फोटोफ्रेम’ या मुक्त छंदातल्या विभिन्न आशयांच्या विचारप्रवण कविता कवीचं वेगळेपण सिद्ध करतात. चाफा हा कवीचा प्राण आहे. कवीचं चाफ्याशी आणि कवितेशी असलेलं घनिष्ठ नातं संग्रहभर फुलत जाऊन ‘केवळ चाफा’ गझलेतील एका शेरातून त्याची छटा उमटते.
‘लिलाव’, ‘शृंगाराची शोककथा’, ‘विनाशाचा आरंभ’, ‘कायदा विश्व विधात्याचा’, ‘मरणाअगोदरचं मरण’, ‘आई’, ‘वास्तव’, ‘संवेदना’, ‘विचार’ आदी कवितांचे हस्तलिखित वर्गमैत्रिणीने जपून ठेवले म्हणून त्या कविता काव्यसंग्रहात समाविष्ट करता आल्यात. “नाहीतर, माझ्याकडून छत्री आणि कविता कधी हरवेल सांगता येत नाही!’’ अशी मनोगतात बेफिकिरीची बिनधास्त कबुली देणारा हा अवलिया कवी तितकाच कलंदर वाटतो. खरं तर उपरोल्लेखीत कविताच प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या यूएसपी आहेत. त्यात निसर्ग आहे, प्रेम आहे, ममत्व आहे, महत्त्वाचे म्हणजे समाजभान राखणाऱया आहेत.
प्रत्येक शब्दाशी, ओळीशी, चरणाशी, वृत्तांशी, छंदाशी, शेराशी कवी प्रामाणिक असल्याचा सुखद अनुभव तर मिळतोच. तद्वतच जीवनाचं तत्त्वज्ञान, सुखाची खरी ओळख तर दुःखाची जाणीव करून देणारा हा कवी तितकाच आश्वासक वाटतो. आईकडून मिळालेली काव्यलेखन प्रेरणा ही प्रांजळ भावना संग्रहभर कवितेतून जाणवत राहते. काव्यातील उत्स्फूर्तता, मनन, चिंतन, दिलखुलास हास्यामागे लपलेली वेदना, सोसलेलं दुःख असो वा विरहाची वेदना, समाजातील व्यंगावर, विसंगतीवर तिरकस, परखडपणे तसेच नेमकेपणाने ठेवलेले बोट! सारं काही स्तिमीत करणारं आहे. एकूण 67 कवितांमधून सर्वच काव्य प्रकारांवर असलेली कवीची हुकमत वाखाणण्याजोगी आहे. विषय वैविध्य असलेला ‘चैतन्यचाफा’ वेगवेगळ्या कवितांच्या रूपात पानोपानी वाचकाला भेटत राहतो.
चैतन्यचाफा
कवी ः चैतन्य कुलकर्णी ‘शऊर’
प्रकाशक ः स्वयं प्रकाशन
पृष्ठे ः 95
मूल्य ः रु. 180/-