
महाराष्ट्रात 7 जूनऐवजी 26 मे रोजीच अवतरलेल्या पावसाने आठवडा गाजवला. मुंबई, पुण्यासारख्या इतरही महानगरांत रस्त्यांच्या नद्या झाल्या. आताच पेरणी करावी का, या संभ्रमावस्थेत शेतकरी असताना ‘जरा सबूर’ असा सल्ला हवामान खात्याने दिला. पश्चिम सागरातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे निर्माण झालेला पाऊस किती काळ टिकतो हा प्रश्नच होता. तसंच झालं. निदान मुंबईत तरी पावसाने मधेच दडी मारली. गेल्या काही वर्षांत जूनच्या सुरुवातीला ‘मस्टरवर सही करून’ दांडय़ा मारणाऱया पावसाचा ‘पॅटर्न’ रूढ झालाय. तो संततधार धरतो साधारण जूनच्या शेवटच्या आठवडय़ात.
आपला देश पावसाळी ऋतूचा. पावसाळा हा संपूर्ण ऋतू असणारं आपलं उपखंड पृथ्वीवर एकमेव आहे. बाकीच्या जगात उन्हाळा, हिवाळ्याच्या मध्यावर थोडा-थोडा पाऊस पडतो. आपल्याकडे सलग चार महिने म्हणजे एक तृतीयांश वर्ष आकाश मेघाच्छादित असतं आणि उघडे-बोडके कातळी डोंगरही हिरवेगार होतात. महाराष्ट्रात कुठे 30, तर कुठे 120 इंचांपर्यंत पाऊस पडतो. कोकणपट्टय़ात (मुंबईसह) प्रचंड पाऊस होतो, तर मराठवाडय़ात सर्वात कमी. तरीसुद्धा पडणारं पाणी पकडता आणि साठवता आलं तर निदान पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही एवढं ‘दान’ पाऊस निश्चितच देतो. आपण मात्र वर्षानुवर्षांच्या बिकट अनुभवानेसुद्धा पावसाचा गेल्या काही वर्षांतील बदलता पॅटर्न समजून घ्यायला कमी पडत आहोत.
पाणी साठवण्याचे अनेक प्रकार आहेत. जलसंचय करण्यासाठी टाक्या बांधण्यापासून ते बंधारे, धरणे बांधण्यापर्यंत. परंतु त्याबद्दलच्या जागरूकतेकचा दुष्काळ अधिक आहे. निसर्गाच्या लहरीनुसार आपली जीवनपद्धती बदलली पाहिजे. त्यासाठी विज्ञान नवनवीन संशोधन करतच असतं.
आजकाल पावसाळ्यात काही वेळा दुष्काळी मानल्या गेलेल्या भागातही अचानक ढगफुटी होऊन बदाबदा पाणी पडते. रस्त्यांच्या नद्या होतात, वावरं भरतात, पेरणी फुकट जाते आणि दोन-चार दिवसांत सारं पाणी वाहून गेल्यावर पुन्हा सारं कोरडं ठणठणीत होतं. खेडोपाडय़ात असं घडतं, तर महानगरात पाणी मुरायलाच जागा नसल्याने दरवर्षी वाढता पूर येतो.
यावर एक उपाय सुमारे 200 वर्षांपूर्वीच शोधला गेलाय. सध्या सर्वत्र काँक्रीटीकरणाचा जमाना आहे. मोठमोठय़ा इमारतींभोवतीची जागा असो किंवा रस्ते, ते मजबूत काँक्रीटचे करण्यात येतात. परिणामी आपल्यासारख्या पावसाळी प्रदेशात जे पाणी अवकाशातून पडतं ते जमिनीत मुरायची (शहरातील तरी) प्रक्रिया खूपच मंदावली आहे. हे काँक्रीटीकरण जगभरच सुरू असतं. ते सुरू झालं त्याच काळात सच्छिद्र (पोरस) अथवा पर्मिएबल म्हणजे पाणी मुरण्याची क्षमता असलेल्या काँक्रीटचा विचार केला गेला होता. मजबूत, परंतु सच्छिद्र काँक्रीटचे रस्ते, फूटपाथ (साइडवॉक) पिंवा पायवाटा तयार केल्या तर (त्या पाणवाटाही होऊन) पावसाचे पाणी त्यातून सहज कसे आत झिरपते याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. पाण्याच्या टंचाईचा सामना आता अमेरिकेतील पॅलिपहर्निया राज्यालाही करावा लागतो. मग विकसनशील आणि मागास देशांची काय अवस्था असेल. गेल्या दोनशे वर्षांत माणसाने भूगर्भातले इतके पाणी उपसले आहे की, त्यामुळे पृथ्वीचा अक्षसुद्धा सूक्ष्मतेने का होईना, पण कलल्याचे म्हटले जाते. भविष्यकाळात लहरी पाऊस केवळ समुद्रावरच भरमसाट कोसळला तर समुद्राचं गोडं झालेलं पाणी समुद्रालाच परत मिळेल आणि भूपृष्ठावरच्या माणसासकट सर्व प्राण्यांना तहान भागवणं कठीण जाईल.
यासाठी पूर्ण अभ्यास करून ‘थर्स्टी’ किंवा तहानलेल्या म्हणजेच सच्छिद्र काँक्रीटचा वापर भूपृष्ठावर अधिकाधिक केला तर पावसाचं ‘फुकटं’ जाणारं वाहतं (रन-ऑफ) पाणी जमिनीत मुरेल. पूर येण्याचं, पाणी तुंबण्याचं प्रमाण कमी होईल. भूजलाची पातळी वेगाने वाढून आसपासच्या विहिरी, बोअरवेल, तळी यांमधल्या झऱयांना पुन्हा संजीवनी लाभेल. पाणी साठवण्याचे बोगदे बांधावे लागणार नाहीत. काँक्रीटच्या बांधकामाने कृत्रिमरीत्या तापमान वाढलेल्या शहरांमध्ये गारवा निर्माण होईल. जमिनीत मुरलेल्या पाण्यामुळे हिवाळा आणि हिवाळी पिके चांगली येतील.
रस्त्यांचं काँक्रीट बनवताना त्यातील सिमेंट, खडी, रेती यांच्या विशिष्ट प्रमाणातून आणि योग्य तेवढय़ाच पाण्यात काँक्रीट तयार करून ते साध्य करता येईल. आपल्या देशातील प्रदेशातील पाऊसमान आणि हवामान यांचं प्रमाण लक्षात घेऊन तज्ञ मंडळी यावर विचार करू शकतात. चीनमध्ये या तंत्राचा मोठय़ा प्रमाणावर वापर करून भूजलसाठा वाढवण्याचा प्रयत्न होतोय. आपल्याकडे ते शक्य होईल का? कारण तहानलेले काँक्रीट अखेर जमिनीची तहान भागवणार आहे.