
उत्तराखंड काँग्रेसने रविवारी केदारनाथजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताला ‘अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद’ असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अपघातासाठी भाजप सरकारच्या ‘हवाई सेवा संदर्भातील निष्काळजी व हलगर्जीपणा’ जबाबदार धरले आहे. (Congress blames BJP’s lax air safety rules for Kedarnath chopper crash | Chardham Yatra helicopter tragedy).
रविवारी सकाळी, खराब दृश्यमानतेमुळे केदारनाथ मंदिरातून यात्रेकरूंना घेऊन निघालेलं एक हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला.
चारधाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून, त्या मार्गावर आतापर्यंत पाचवे हेलिकॉप्टर अपघात घडला आहे.
उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन) सूर्यकांत धस्माना यांनी एका पत्रकात सांगितले की, ‘राज्यात चारधाम यात्रा सुरू होऊन फक्त एक महिना आणि काही दिवस झाले आहेत, पण आतापर्यंत पाच हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. आजच्या अपघातात काही जणांचे प्राण गेले ही अतिशय दुःखद आणि गंभीर बाब आहे. या सगळ्याला उत्तराखंडातील भाजप सरकारचे निष्काळजी आणि ढिसाळ हवाई सेवा धोरणे पूर्णतः जबाबदार आहेत.”
धस्माना यांनी सांगितले की, काँग्रेसने राज्य सरकारकडे हवाई वाहतूक नियंत्रण (Air Traffic Control – ATC) नियम काटेकोरपणे राबवण्याची मागणी केली होती. मात्र, पैसे कमावण्याच्या घाईत काही हेलिकॉप्टर कंपन्या नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी दावा केला की, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरसह आणखी दोन हेलिकॉप्टर त्याच ठिकाणाहून उड्डाणासाठी तयार होती, मात्र अपघात होताच ती दोन्ही परत आली.
धस्माना यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हेलिसेवांबाबत दिलेल्या आदेशांची यामार्गावर सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कोणताही परिणाम होत नाही.
‘मुख्यमंत्र्यांनी खराब हवामानात हेलिकॉप्टर न उडवण्याबाबत दोन दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्यानंतरही हेलिकॉप्टर सेवा सुरू ठेवली जात आहे, यावरून स्पष्ट होते की काही कंपन्या केवळ पैसे कमवण्यासाठी प्रवाशांचे प्राण धोक्यात घालायला तयार आहेत’, असेही धस्माना म्हणाले.
काँग्रेसने मागणी केली की, राज्य सरकारने हवाई वाहतूक नियंत्रण नियम कठोरपणे लागू करावेत आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी.
तसेच हेलिकॉप्टरमधील स्वच्छतेचा ऑडिट व इतर सुरक्षा निकषही काटेकोरपणे पाळले जावेत, असे त्यांनी सांगितले.