भाजप-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट बघते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? नाना पटोले यांचा सवाल

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे मुंबई महापालिका प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात. दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डिंग माफियांना भाजप-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या घटनेप्रकरणी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेवरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू तर जवळपास 88 जण जखमी झाल्याची दुर्घटना वेदनादायी आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढवून दिली पाहिजे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने केला पाहिजे. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. कमशिनच्या हव्यासातून मुंबई शहर बकाल केले आहे. घाटकोपरमधील होर्डिंग हे एक उदाहरण आहे, अशी हजारो होर्डिंग अनधिकृत रितीने शहरभर झळकत आहेत. मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचे आशिर्वाद असल्याशिवाय असे अनधिकृत होर्डिंग लावले जावू शकत नाहीत. घाटकोपरच्या होर्डिंगला कोणी परवानगी दिली होती, त्यामागे कोणत्या राजकीय नेत्याची शिफारस होती का, या सर्वांची सखोल चौकशी करून खऱ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कारवाईच्या नावाखाली कोणाला तरी बळीचा बकरा करुन महाभ्रष्ट युती सरकार आपली सुटका करुन घेऊ शकत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

अवैध होर्डिंग असो वा मोडकळीस आलेल्या इमारती, महानगरपालिका फक्त नोटीस पाठवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत असते. दुर्घटना झाल्यानंतर थातूर मातूर कारवाई केली जाते. मागील दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरु आहे. सत्ताधारी पक्षाचे दोन पालकमंत्री महापालिकेच्या कार्यालयात स्वतःची कार्यालये थाटून बसले आहेत. हे दोन्ही पालकमंत्री काय झोपा काढत होते का? का मुंबई महापालिका कार्यालयातून फक्त वसुलीचे काम करत होते? आता दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी झटकून दुसऱ्यांवर आरोप करण्याची नौटंकी भाजप नेते करत आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.