वाघांची शिकार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपूरमध्ये वन विभागाची कारवाई

विदर्भात वाघांच्या हत्येचे सत्र सुरूच आहे. याचदरम्यान वन विभागाने सोमवारी बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात ही कारवाई केली. बहेलिया टोळीने 2013 ते 2015 या कालावधीत विदर्भातील जवळपास 19 वाघांची शिकार केल्याचा आरोप आहे. अलीकडे झालेल्या वाघांच्या हत्येमागे अजित राजगोंडचा हात असण्याचा संशय आहे.

मागील महिनाभरात विदर्भात 11 वाघांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांची हत्या झाल्याचा संशय असतानाच वन विभागाने संशयितांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. बहेलिया टोळी मध्य प्रदेशातील आहे. 2013 ते 2015 या अवधीतील 19 वाघांच्या शिकारीमागे अजित राजगोंड व त्याचे भाऊ केरू व पुट्टू यांचा हात आहे. अजितला 2015 मध्ये वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने तिरुपतीमधून अटक केली होती. सीबीआयने त्या प्रकरणाचा अधिक तपास केला आणि अजितला शिक्षा झाली होती. सप्टेंबर 2024 मध्ये तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. गेल्या महिनाभरात झालेल्या वाघांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर वन विभाग त्याची अधिक चौकशी करणार आहे. या भागात अजित किती दिवसांपासून राहत आहे? त्याने वाघांची शिकार केली का? त्याच्या टोळीतील कितीजण या भागात वावरत आहेत, याची उकल करण्यासाठी वन विभागाचे विशेष पथक अजित राजगोंडची कसून चौकशी करीत आहे.

दोन बिबटय़ांना बर्ड फ्लूची लागण

चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील चारपैकी दोन बिबटय़ांची बर्ड फ्लूची सिरो टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. भोपाळ येथील प्राण्यांच्या प्रयोगशाळेकडून चाचणीचा अहवाल आला आहे. यापूर्वी चार गिधाडांची बर्ड फ्लू टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पात गिधाडांचा मृत्यू झाला होता. बर्ड फ्लूची लागण झालेल्या गिधाडांमुळे तीन वाघ संक्रमित झाले होते.