‘चांद्रयान-2’ आणि ‘चांद्रयान-3’च्या यशात बारामतीकरांचे मोठं योगदान! – सुप्रिया सुळे

‘चांद्रयान-3’च्या यशावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या यशस्वी उड्डानंतर जगभरात हिंदुस्थानचे नाव नव्याने उज्वल झाले आहे. ‘चांद्रयान-2’ आणि ‘चांद्रयान-3’ या मोहिमेकरिता इलेक्ट्रिक पार्ट आणि इतर साहित्य बारामती येथील कंपनीच्या वतीने पुरवण्यात आले होते. ही पुणे जिल्ह्यासाठी आणि बारामतीसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे.

लोकसभेमध्ये सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात आज चांद्रयान मोहिमेबाबत प्रस्तावावर चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेदरम्यान सभागृहांमध्ये कॅबिनेट मंत्री या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान उपस्थित राहत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. एकही कॅबिनेट दर्जाचा मंत्री उपस्थित नसावा याबद्दल सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात खेदही व्यक्त केला. तसेच सभापतींनी मंत्र्यांना रोलिंग द्यावा असे म्हणत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

‘चांद्रयान-2’ आणि ‘चांद्रयान-3’ यशस्वी उड्डाणाबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्व शास्त्रज्ञांनी अभिनंदन केले. मला अभिमान आहे की, मी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती या मतदारसंघातून निवडून येते. आज त्या मतदार क्षेत्रातील काही कंपन्यांनी या मोहिमेच्या यशस्वी उड्डाणामध्ये मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. त्यामध्ये वालचंद हिराचंद यांची 100 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कारखान्यातून या चांद्रयानाचे काही भाग बनवण्यात आले आहे. तसेच व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे भानुदास भोसले, सुजाता भोसले, संदीप चव्हाण यांनी बनवलेली इलेक्ट्रॉनिक चीप यामध्ये बसवलेली आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.