
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप शेतपिकांचे पंचनामे झालेले नाहीत. शासकीय कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे रखडल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. आपण नांदेड आणि लातूरमध्ये होतो. तिथेही काश्मीरप्रमाणे अर्धाफुटापर्यंत बर्फ साचला होता. राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा वेळी राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे शेतपिकांचे पंचनामे रखडले आहेत. काही ठिकाणी पंचनामे झाले, तरी त्यावर सरकारी कर्मचारी सह्या करत नाहीत, शेतकरी संकटात सापडला असताना शिंदे सरकार मात्र, राजकारण करण्यात व्यस्त आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.
सरकार सर्वसामान्यांचे आहे, असे म्हटले जाते. मग सर्वसामान्यांचे अश्रू कोण पुसणार? जनतेचे अश्रू पुसायचे सोडून शिंदे सरकार एकमेकांवर आरोप करण्यात गुंतले आहे. सरकारकडून केवळ राजकारण करण्यात येत असून सर्वसामान्य जनतेकडे दुर्लेक्ष केले जात आहे, अशी टीकाही भुजबळ यांनी केली. शेतपिकांच्या रखडलेल्या पंचनाम्यांवरून विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच या मुद्द्यावरून विरोधकांनीही सभात्याग केला.