तुम्ही जगाला मूर्ख बनवाल, पण स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला कसे फसवाल! सरन्यायाधीशांनी कान टोचले

तुम्ही सर्व जगाला मुर्ख बनवू शकता परंतु, तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला फसवू शकत नाही. विधी कार्याचे भवितव्य या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक त्यांच्यातील प्रामाणिकपणा राखतात की नाही यावर अवलंबून असेल. प्रामाणिकपण हा विधी व्यवसायाचा गाभा आहे आणि त्याची समृद्धी किंवा नाश त्याच्याशी संबंधित लोकांच्या वर्तनावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन हिंदुस्थानचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना केले.

‘वकील आणि न्यायाधीश यांच्यातील सहकार्य वाढवणे, कायदेशीर व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रामाणिकपणा वादळाने पुसला जात नाही, तो वकील आणि न्यायाधीशांनी दिलेल्या छोटय़ा सवलती आणि त्यांच्या प्रामाणिकपणाने केलेल्या तडजोडीमुळे पुसला जातो. आपल्या व्यवसायात भरभराट होईल की आत्म-नाश होईल हे आम्ही आमची सचोटी राखतो की नाही यावर अवलंबून असेल, असेही ते यावेळी म्हणाले. आपण सर्वजण आपल्या सदसद्विवेकबुद्धीने झोपतो. तो रोज रात्री प्रश्न विचारत राहतो. प्रामाणिकपणा हा कायदेशीर व्यवसायाचा गाभा आहे. प्रामाणिकपणाने आपण एकतर जगू किंवा स्वतःचा नाश करू, इतकेच आपल्या हातात आहे. वकील जेव्हा न्यायाधीशांचा आदर करतात आणि न्यायाधीशांना सन्मान मिळतो, तेव्हा ते वकिलांचा आदर करतात, असेही ते म्हणाले.  माझा विश्वास आहे की विधी व्यवसायाला समान संधी देणारे व्यवसाय करणे हे महत्त्वाचे आव्हान आहे, असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.