सुरुवात दमदार होऊ दे ! गिलच मनं जिंकणार असा वेंगसरकरांचा विश्वास

इंग्लंडच्या वातावरणात जो लवकर रमतो, तोच जिंकतो. त्यामुळे सुरुवात दमदार होऊ दे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांतील कामगिरीच निर्णायक ठरणार आहे. यात जो आघाडी घेईल तोच मालिकेत आघाडीवर, असे मत व्यक्त केलेय हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी. एवढेच नव्हे तर नवोदित कर्णधार शुभमन गिलवर खूप मोठी जबाबदारी टाकण्यात आली असली तरी तोच सर्वांची मनं जिंकेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

गेल्या दोन मालिकांत हिंदुस्थानला दारुण पराभवांना सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडच्या सामान्य संघाने हिंदुस्थानला 3-0 अशी धूळ चारली होती. या पराभवाने हिंदुस्थानची मायदेशातील विजयाची परंपरा खंडित झाली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील हिंदुस्थानचे आव्हानही अडचणीत आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाकांक्षी दौराही हिंदुस्थानसाठी पराभव घेऊन आला. जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली पर्थवर खेळला गेलेला पहिला कसोटी सामना जिंकत हिंदुस्थानने मालिकेत आघाडी घेतली, पण त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया पेटून उठली आणि त्यांनी मालिका 3-1 अशी खिशात घालत हिंदुस्थानला नमवले. आता या दोन अपयशानंतर म्हणजे आठपैकी सहा कसोटींत हार मानणारा हिंदुस्थानचा संघ इंग्रजांच्या भूमीवर पोहोचलाय. 2021-22 ला हिंदुस्थानला पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी होती, मात्र इंग्लंडने ही मालिका बरोबरीत सोडवण्याचा पराक्रम केला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. आताही हिंदुस्थानचा संघ मालिका जिंकण्याचे ध्येय घेऊनच लंडनला दाखल झाले आहेत.

गिल सर्वांचे जिंकणार दिल

शुभमन गिल एक जबरदस्त खेळाडू आहे. आता त्याला आपल्यात नेतृत्वक्षमता असल्याचेही दाखवून द्यायची वेळ आलीय. गिलला आजवर कसोटी क्रिकेटमध्ये फार धमाकेदार कामगिरी करता आली नसली तरी त्याच्यासाठी हा दौरा दुहेरी आक्रमणाचा असेल. त्याला आपल्या फलंदाजीची कमाल दाखवावीच लागणार. तो फलंदाज म्हणून यशस्वी ठरला तर त्याला नेतृत्व करणे अधिक सोप्पे जाईल. त्याच्यासाठी सलामीच नव्हे तर मधल्या फळीतही खेळण्याचा पर्याय आहे. तो कोणत्याही स्थानी स्वतःला फिट करू शकतो. पण तो सलामीला उतरला तर तो आपला अधिक प्रभाव दाखवू शकतो. शेवटी तो कोणत्या क्रमांकावर खेळेल, हे संघव्यवस्थापनच निश्चित करेल, पण इंग्लंडविरुद्ध गिलच सर्वांचे दिल जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पहिली, तिसरी आणि पाचवी कसोटी बुमराने खेळावी

हिंदुस्थानसाठी जसप्रीत बुमराचा फिटनेस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला केवळ तीनच कसोटींत खेळविले जाणार असल्याचे गुरुवारीच प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितले. मात्र त्या तीन कसोटी कोणत्या त्या परिस्थितीनुसार ठरविल्या जातील. पण मी संघात असतो तर मी बुमराचा उपयोग पहिल्या, तिसऱया आणि पाचव्या कसोटीत खेळविले असते. या तीन कसोटींतच मालिकेचा निकाल लावला जाणार आहे.

बॅझबॉलसमोर जैसवाल

इंग्लंड आपल्या ‘बॅझबॉल’ या आक्रमक शैलीमुळे खूपच प्रसिद्ध झाले आहेत. ते या शैलीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या सुपर फॉर्मात असलेला यशस्वी जैसवाल हा ‘बॅझबॉल’ला भिडणारा सलामीवीर असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याने आपल्या झंझावाताचा यजमानांना तडाखा दिला होता. आता तोच झंझावात इंग्लंडच्या गोलंदाजांनाही हैराण करून सोडेल. इंग्लिश वातावरणात ‘बॅझबॉल’विरुद्ध जैसवाल असे द्वंद्वही पाहायला मिळेल. संघात रोहित-विराट नसले तरी अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, करुण नायर यांच्या सोबत ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल हेसुद्धा असतीलच. के. एल. राहुल हासुद्धा हिंदुस्थानची फलंदाजी मजबूत करणारा दुवा असेल. गोलंदाजीबरोबर आपली फलंदाजीही निश्चितच बळकट आहे. इंग्लिश गोलंदाजांसाठी आपले फलंदाज नक्कीच आव्हानात्मक खेळ करतील.

पहिल्या दोन कसोटी महत्त्वाच्या

इंग्लंडच्या दौऱयात वातावरण हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फॅक्टर असतो. त्यामुळे या मालिकेत हिंदुस्थानसाठी लीड्स आणि बार्ंमगहम येथील पहिल्या दोन्ही कसोटी महत्त्वाच्या आहेत. या दोन सामन्यांत हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंना वातावरणाशी जुळवून घ्यावे लागणार आणि सुरुवातही दमदार करावी लागणार. ज्यांची सुरुवात दमदार होते, त्याचीच इंग्लंडमध्ये चालते. आपल्या खेळाडूंसाठीही पहिल्या दोन कसोटींतील खेळ महत्त्वाचा ठरणार, असेही वेंगसरकर म्हणाले.

नवे आहेत, पण छावे आहेत

संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज नाहीत. त्यांची उणीव ही क्षणाक्षणाला नक्कीच जाणवेल, पण आपले नव्या दमाचे खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून इंग्लंडमध्ये खेळतील. त्यांना करून दाखवण्याची संधी बीसीसीआयने दिली आहे. आपले खेळाडू नवे असले तरी छावे आहेत. त्यांनीही आपला खेळ रणजी करंडक आणि आयपीएलमध्ये दाखवला आहे. त्यांच्यावर इंग्लंडच्या थंड वातावरणाचा नक्कीच प्रभाव असेल, पण बीसीसीआयने आधीच ठेवलेल्या दोन सराव सामन्यांमुळे ते वातावरणाची पहिल्या कसोटीपूर्वीच जुळवून घेतील. हा नवा संघ ‘हम भी कुछ कमी नहीं’ हे असल्याचे दाखवून देईल.