लैंगिक अत्याचाराच्या गुह्यात आरोपी 30 वर्षांनंतर निर्दोष, दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्णय

लैंगिक अत्याचाराच्या गुह्यात पीडित मुलीचा जबाब ‘विश्वसनीय’ असणे आवश्यकच आहे. पीडित मुलीचा जबाब विश्वसनीय असेल तरच आरोपीचे दोषत्व सिद्ध करण्यासाठी केवळ तिचा जबाब पुरेसा ठरू शकतो, असे निरीक्षण नोंदवत दिंडोशी सत्र न्यायालयाने नोंदवला सबळ पुराव्याअभावी 30 वर्षांपूर्वीच्या गुह्यात आरोपीची निर्दोष सुटका केली.

आरोपी रोशनलाल ठाकूरला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याचे अॅड. स्वप्नील कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. रोशनलाल हा मागील नऊ वर्षे तुरुंगात होता. केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने तो तुरुंगात खितपत पडला होता. त्याला ‘दर्द से हमदर्द तक’ संस्थेने रोशनलालला कायदेशीर मदत पुरवली. खटला सुरू झाल्यावर केवळ 23 दिवसच केस चालली. रोशनलालला 10 जुलै 1995 रोजी अटक केली होती. नंतर 30 ऑक्टोबर 1995 रोजी त्याची जामिनावर सुटका झाली होती. आरोपीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने 15 ते 16 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा आरोप होता. तथापि, पीडित मुलीने आरोपीविरोधात तक्रार केलीच नव्हती, असे सांगून पोलिसांनी केलेले आरोप नाकारले. त्याची गंभीर दखल घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी आरोपी रोशनलाल ठाकूरला सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले. सरकारी पक्षाने पीडित मुलीव्यतिरिक्त एकाही साक्षीदाराचा जबाब नोंदवलेला नाही. तसेच पोलिसांनी नोंदवलेल्या पीडित मुलीच्या जबाबाला पुष्टी देणारे इतर सबळ पुरावे नसल्याचे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दिलासा दिला.