नालेसफाईचे पितळ उघडे, डोंबिवलीत निवासी भागात सांडपाणी गुडघाभर तुंबले

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नालेसफाईचे पितळ उघडे पडले आहे. अपुऱ्या व अयोग्य नियोजनामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. व्यवस्थित नालेसफाई न झाल्यामुळे घाण आणि सांडपाणी इमारतींच्या आवारात साचत असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांनी अनेकवेळा एमआयडीसी व केडीएमसीकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

शनिवारी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे संदेश सोसायटी व आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या परिसरात गुडघाभर सांडपाणी साचले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही स्थिती असेल तर पुढील तीन महिन्यांत ही समस्या गंभीर बनेल, अशी भीती रहिवाशांमध्ये आहे. नालेसफाई, रस्ते, गटार याचे कुठलेच नियोजन नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास एमआयडीसी कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारू, असा इशारा शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी पदाधिकारी विनिता सावंत आणि राजू नलावडे यांनी दिला आहे.

केडीएमसी-एमआयडीसीचा वेळकाढूपणा
एमआयडीसी अंतर्गत असलेल्या सांडपाणी वाहिन्यांपैकी अनेक ठिकाणी चेंबर्स तुंबले आहेत. काही ठिकाणी वाहिन्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी उघड्यावर वाहत आहे. याच्या दुरुस्तीची जबाबदारी एमआयडीसीची आहे. तर गटार व नाल्यांची साफसफाई करण्याचे काम केडीएमसीकडे आहे. मात्र दोन्ही यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे.