
जागेचा वाद न्यायालयात नेला म्हणून मुरुड तालुक्यातील चोरढे गावात एका कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे. या कुटुंबाशी कोणीही संपर्क ठेवून नये, अशी दमदाटी गावकीच्या सभेत ग्रामस्थांना करण्यात आली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी २३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अलिबाग तालुक्यातील खैरवाडी येथे एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा मुरुडमध्येही हा प्रकार घडल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
मुरुड तालुक्यातील चोरढे गावातील एका समाजातील ग्रामस्थांनी गावातील जुन्या हनुमान मंदिराच्या जागेत नवीन मंदिराचे बांधकाम केले. मंदिराच्या बांधकामामुळे या ठिकाणी नियोजित असलेल्या वास्तूची जागा बदलावी लागली. ही वास्तू आता भररस्त्यात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. ही जागा बदलावी यासाठी एका कुटुंबाने समाजाच्या पंचांबरोबरच शासनाकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तक्रारदार कुटुंबाने या बांधकामाविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.
… तर तीन हजार दंड
या गोष्टीचा राग मनात धरून चोरढे गावातील समाजाचे पंच मंडळ आणि इतर २३ जणांनी गावातील हनुमान मंदिरात गावकीची सभा घेतली आणि न्यायालयात दाद मागणाऱ्या कुटुंबाला वाळीत टाकले. या कुटुंबाशी संबंध ठेवण्यास इतर ग्रामस्थांना मज्जाव केला. संबंध ठेवल्यास तीन हजार रुपयांचा दंड करण्याचा ठरावही घेतला. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पंच कमिटी व इतर ग्रामस्थ अशा २३ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































