अवयव विक्रीची दखल नाही, गोरेगावच्या शेतकर्‍यांनी अन्नत्याग केला; दूध सांडून सरकारचा निषेध

बँकेचे कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीला काढणार्‍या शेतकर्‍यांची मिंधे सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांनी अन्नत्यागाचे अस्त्र उपसले असून गोरेगाव तहसील कार्यालयासमोर दूध सांडून सरकारचा निषेध केला.

यंदाच्या वर्षी खरीप हंगामात कधी पावसाचा खंड, तर कधी अतिवृष्टी यामुळे शिवारातील पिकांची नासाडी झाली. सोयाबीन, कापूस, तूर असे कोणतेही खरीप पीक शेतकर्‍यांच्या हाती आले नाही. पीकविमा काढूनही उपयोग झाला नाही. खरिपासाठी म्हणून काढलेले कर्ज मानगुटीवर बसले. बँकांनी कर्ज परतीसाठी तगादा लावल्याने गोरेगावच्या दहा शेतकर्‍यांनी आपली किडनी, लिव्हर तसेच डोळे विक्रीला काढले. दरपत्रकासह अवयव विक्रीची जाहिरात सोशल मीडियावर झळकताच खळबळ उडाली. त्यानंतर या शेतकर्‍यांनी मुंबई गाठली. परंतु सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. या शेतकर्‍यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

राज्यातील मिंधे सरकारने आपल्या मागणीची कोणतीही दखल न घेतल्याने या शेतकर्‍यांनी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर दूध सांडून सरकारचा निषेध करत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनात नामदेव पतंगे, गजानन कावरखे, बबन खिल्लारी, रामभाऊ कावरखे, संजय मुळे, नारायण रवणे, संतोष वैद्य, शिवाजी कावरखे, बाळू जाधव, मदन कावरखे, रामेश्वर कावरखे, अक्षय पाटील, सुनील मधुरवाड, शोभा लांभाडे, राधाबाई थुकसे, शांताबाई लांभाडे आदी सहभागी झाले आहेत.