
राज्यात मागील आठ महिन्यांत 1 हजार 183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून दिली. या शेतकरी आत्महत्यांना राज्यातील असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकार कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या या महायुती सरकारमुळे आठ महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम विदर्भात 707 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सत्तेसाठी या सरकारने भोळ्याभाबड्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते मिळवली. पण शेतकऱ्यांना मिळाले काय तर कर्जमाफीसाठी समिती असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात, समाजात फूट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झालेय. शेतकरी मेला, कुटुंब उद्ध्वस्त झाले तरी यांना लाज नाही.
विश्वासघातकी महायुती सरकार
कृषी खात्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱयांना टॅब द्यायचे का लॅपटॉप यावरून वाद सुरू आहेत. हे खाते शेतकऱ्यांसाठी काम करते का? शेतकरी आत्महत्यांसाठी थेट जबाबदार कोण असेल तर ते म्हणजे असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकार, असे नमूद केले आहे.