
घरी मोठ्या मुलाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती. सर्व आनंदात होते. मात्र त्याआधीच काळाने घाला घातला अन् लग्नघर शोकसागरात बुडालं. घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. घरातून धूर निघताना पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलीस आणि अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
गुजरातमधील गोधरा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बामरौली रोडवरील वृंदावन 2 सोसायटीत दोषी कुटुंब राहत होते. शेजाऱ्यांनी दोषी यांच्या घरातून धूर येताना पाहिला. त्यांनी पोलीस आणि अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घराचा दरवाजा तोडला. घराच्या पती-पत्नी आणि दोन मुलं बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात येत आहे. तपासाअंती आगीचे कारण कळेल. काही दिवसातच दोषी यांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा होणार होता. परंतु तत्पूर्वीच संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





























































