महाराष्ट्राचा 70 टक्के दुधाचा धंदा गुजरातच्या कंपन्यांनी पळवला; पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगरमधील स्थानिक ब्रॅण्ड संकटात

देशभरातील विविध राज्यांनी आपल्या राज्यामधील दूध उत्पादकांचे हितरक्षण करण्यासाठी स्थानिक सहकारी ब्रँड विकसित करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात मात्र, सरकारकडून महानंद, आरेसारखे ब्रँड टिकविण्याऐवजी परराज्यातील कंपन्यांना पायघडय़ा घातल्या जात आहेत. राज्य सरकारच्या अनास्थेमुळे महाराष्ट्राचा 70 टक्के दुधाचा धंदा गुजराती कंपन्यांनी पळवला असून मुंबईतील 85 टक्के दुधाच्या पाऊच पॅकेजवर गुजरातमधील पंपन्यांनी कब्जा केला आहे. गुजरातमधील अमूल व अन्य कंपन्यांच्या आक्रमणामुळे पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगरमधील स्थानिक ब्रँड आज संकटात आले आहेत.

महाराष्ट्रातील दूध व्यवसायात गुजरातमधील खासगी डेअरी अतिक्रमण करत असल्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीच जाहीरपणे एका कार्यक्रमात सांगत महाराष्ट्रातील दूधाचा धंदा कसा पळवला जात आहे याची कबुली दिली आहे. मुळात राज्यातील दुधाचा धंदा परराज्यातील दूध कंपन्या पळविण्यास राज्य सरकारचे याबाबतचे धोरण कारणीभूत असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले म्हणाले. गुजरातमधील अमुल कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दूध उत्पादन क्षेत्रावर मागील काही वर्षांपासून कब्जा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच महानंद हा ब्रँड सरकारने गुजरातमध्ये मुख्यालय असणार्या एन.डी.बी. कडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला ही एक मोठी धोक्याची घंटा असल्याचे ते म्हणाले.

कर्नाटक सरकारने ‘नंदिनी’, तामिळनाडू सरकारने ‘अविन’ व केरळ सरकारने ‘मिल्मा’ हे स्थानिक सहकारी बँड विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या राज्यातील शेतकरी व सहकारी शिखर संस्था वाचविण्यासाठी अनुदाने व पाठबळ दिले आणि गुजरातचे ‘अमूल’च्या माध्यमातून होत असलेले आक्रमणही रोखले. मात्र, महाराष्ट्रात सरकारकडूनच गुजरातमधील कंपन्यांना दुग्धव्यवसायावर अतिक्रम करण्याची संधी दिली जात असून जवळपास 70 टक्के मार्वैटवर त्यांनी कब्जा केल्याचे अजित नवले म्हणाले.

शेतकरी व खासगी दूध ब्रँड अडचणीत

राज्यात दुधाचे खासगी ब्रँड विकसित झाल आहेत. त्यांच्यामध्ये दूध विकण्याची स्पर्धा लागली आहे. त्यासाठी वितरकांना कमीशन वाढवून दिले जात आहे. परिणामी शेतकऱयांना कमी दर दिला जात आहे. दुसरीकडे अमूल दूधसागर, माही, जैन डेअरी, विमल डेअरी यासारख्या गुजरातमधील दूध कंपन्यांनी महाराष्ट्रातील बाजारपेठ काबीज केल्याने राज्यातील शेतकरी व खासगी ब्रॅण्ड अडचणीत येताना दिसत आहेत.

सरकारने स्थानिक ब्रॅँडच्या मागे उभे राहायला हवे. तामिळनाडू, कर्नाटकने परराज्यातील दूध कंपन्यांना मार्पेटमध्ये घुसू दिलं नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये तसे होताना दिसत नाही. महानंद हा ब्रँडसुद्धा एनडीबीला देऊन टाकला. त्यामुळे गुजरातमधील कंपन्यांचे फावले. – अजित नवले, अखिल भारतीय किसान सभा