
“भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण हिंदुस्थानात हादरवून टाकेन’, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केला आहे. बोनगांव येथे एसआयआर विरोधी रॅलीला संबोधित करताना त्या असं म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला आहे की, “निवडणूक आयोग आता निष्पक्ष संस्था राहिलेली नाही. ती भाजप आयोग बनली आहे.”
एसआयआरवर प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जर एसआयआरचा उद्देश बेकायदेशीर बांगलादेशींना काढून टाकणे असेल, तर ते भाजपशासित राज्यांमध्ये का केले जात आहे? भाजप त्यांच्या ‘डबल-इंजिन’ राज्यांमध्येही घुसखोर अस्तित्वात आहेत, हे मान्य करत आहे का? जर बांगलादेशी समस्या असतील तर ते मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये एसआयआर का करत आहेत?”
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “एसआयआर नंतर मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक आयोग आणि भाजपने किती विनाश केला आहे, हे लोकांना समजेल.” त्या म्हणाल्या, “मला बांगलादेश एक देश म्हणून आवडतो कारण आमची भाषा एकच आहे. मी बीरभूमची आहे, पण एके दिवशी ते मला बांगलादेशी म्हणतील.”
त्या पुढे म्हणाल्या की, “२०२४ मध्ये पंतप्रधान मोदींना या मतदार यादीच्या आधारे मते मिळाली. जर तुमचे नाव वगळले तर केंद्र सरकार देखील काढून टाकले पाहिजे.”


























































