
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गुरुवारी मोठी घटना घडली. 242 प्रवाशांना घेऊन लंडनच्या दिशेने जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदात कोसळले. या अपघातामध्ये 290 जणांचा मृत्यू झाला. यात पत्नीची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुजरातला आलेल्या ब्रिटनमधील हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकाचाही समावेश आहे. अर्जुन मनुभाई पटोलिया (वय – 36) असे या व्यक्तीचे नाव आहे.
अर्जुन मनुभाई पटोलिया हे आपल्या पत्नीच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी हिंदुस्थानात आले होते. त्यांचे पत्नी भारतीबेन यांचे एक आठवड्यापूर्वी लंडनमध्ये निधन झाले होते. मृत्युपूर्ती त्यांनी आपल्या पतीकडे अखेरची इच्छा व्यक्त केली होती. माझ्या अस्थी मातृभूमीतच विसर्जित करा असे वचन त्यांनी पतीकडून घेतले होते. पत्नीची ही अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठीच अर्जुन अमरेली जिल्ह्यातील वाडिया आपल्या मूळ गावी आले होते.
वाडिया येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत अर्जुन यांनी पत्नीच्या अस्थी नर्मदा नदीमध्ये विसर्जित केल्या. त्यानंतर गुरुवारी त्यांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान पकडले. ठरल्याप्रमाणे ते विमान चढले. पण नियतीच्या मनात वेगळेच होते आणि भीषण विमान अपघातामध्ये अर्जुन यांचा मृत्यू झाले.
अर्जुनकडे एअर इंडियाच्या AI171 विमानाचे तिकीट होते. ते लंडनला जाणार होते, पण विमानाचा अपघात झाला. एकाच आठवड्यात आम्ही दोघांनाही गमावले, असे अर्जुनचा भाचा क्रीश जगदीश पटोलिया याने माध्यमांशी बोलताना भरल्या डोळ्याने सांगितले.
दरम्यान, अर्जुन पटोलिया यांना एक 4 वर्षांची आणि एक 8 वर्षांची अशा दोन मुली आहेत. त्या लंडनमध्येच आहेत. आधी आईचे निधन आणि आता नियतीने वडिलांनाही हिरावून घेतल्याने या मुली आता पोरक्या झाल्या आहेत.