…तरीही त्यांनी सुनावणी लावली; जयंत पाटील यांचा निवडणूक आयोगावार आरोप

काही आमदारांसह अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाल्याच्या घटनेला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. काही नेते सोडले तर कोणता आमदार कोणत्या गटात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जनतेतही याबाबत संभ्रम आहे. आमच्या पक्षात कोणतीही फूट पडली नाही, असे आम्ही स्पष्ट केले आहे. असे असताना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे मान्य केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाला 6 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही फूट पडलेली नाही, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते. तरीही निवडणूक आयोगाने पक्षफुटीसंदर्भात सुनावणीची तारीख दिली आहे, असा आरोप जयंत पाटलांनी केला आहे. शरद पवारांनी निवडणूक आयोगाला जे उत्तर दिले होते, त्यात त्यांनी सांगितले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. मला कुणीही विरोध केला नाही. कुणीही माझ्या धोरणांना जाहीरपणे विरोध केला नाही. कुणीही वेगळा सूर काढला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीत माझी अध्यक्षपदी निवड झाली. सगळेच मुद्दे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात मांडले होते, असे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलाही वाद नसल्यामुळे तुमच्याकडे जो पत्रव्यवहार झाला आहे. त्यासंदर्भात आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो, आम्हाला वेळ द्या, असे शरद पवारांनी सांगितले होते. पण निवडणूक आयोगाने वेळ न देता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहे, हे अचानक ठरवले आणि सुनावणीसाठी 6 ऑक्टोबरला बोलावले. निवडणूक आयोगाने शरद पवारांची बाजू मांडण्यासाठी एक संधी देणं आवश्यक होते, असेही पाटील यांनी म्हटले आहे.