कल्याणच्या मांत्रिकाची रेवदंडा पोलिसांनी केली उचलबांगडी, मुलीचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी विटा विहिरीत टाकण्याचा तोडगा

मुलीचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी मंतरलेल्या विटा विहिरीत टाकण्याचा सल्ला देणाऱ्या कल्याणमधील मांत्रिक मौलाना खलिक रझा अन्सारी याची रेवदंडा पोलिसांनी उचलबांगडी केली आहे. नवी मुंबईतील एका दाम्पत्याला हा तोडगा मांत्रिकाने दिल्यानंतर हे दाम्पत्य विटा विहिरीत टाकण्यासाठी थेट मुरुड तालुक्यातील ताडगाव परिसरात गेले. तिथे विटा विहिरीत टाकत असताना त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. विहिरीत विष कालवल्याची बोंबाबोंब परिसरात झाल्याने तणाव पसरला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

नवी मुंबई नेरूळ येथील अखलाक अयुब खान व रेश्मा अखलाक खान यांच्या मुलीचे तुर्भे येथील एका मुलासोबत मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रेम आहे. या प्रेमप्रकरणाला त्यांचा विरोध आहे. मात्र मुलगी मुलासोबत लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. तसेच आईवडील लग्न लावून देत नसल्याने मुलीने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे हे प्रेमसंबंध तोडण्यासाठी अखलाक खान यांनी कल्याण येथील मौलाना खलिक रझा अन्सारी या मांत्रिकाकडे धाव घेतली. मांत्रिकाला मुलीचे प्रेमसंबंध तोडण्याकरिता उपाय करण्यास सांगितले. यावेळी मौलाना खलिक रझा अन्सारी याने मंतरलेल्या 21 विटा देत या विटा 21 विहिरींमध्ये टाकण्यास अखलाक खान सांगितले होते.

मांत्रिकाचा सल्ला अंगलट आला
मांत्रिकाने दिलेल्या सल्ल्यानुसार अखलाक खान हा या विटा मुरुड तालुक्यातील ताडगाव येथील विहिरीत टाकत असताना काही ग्रामस्थांनी त्यांना पकडले आणि मांत्रिकाचा हा सल्ला त्यांच्या अंगलट आला. यानंतर याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करून रेवदंडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने मौलाना खलिक रझा अन्सारी या मांत्रिकाला कल्याण येथून ताब्यात घेतले आहे.