
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा आणि भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना केवायसी प्रक्रियेची सक्ती करण्यात आली आहे. आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा देणारा उमेदवार खरा आहे की डमी याची खात्री पटवण्यासाठी एमपीएससीने हे पाऊल उचलले आहे. एमपीएससीकडून ही माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, नॉन-आधार ऑफलाइन केवायसी अशा चार पद्धतींनी केवायसी करता येणार आहे. एमपीएससीने मार्च 2017 पासून ऑनलाइन प्रणालीत आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी त्या प्रणालीत नोंदवणेही आवश्यक असून उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.