आजार बळावले… रुग्णालयांतील आरोग्य सेवा मात्र रामभरोसे; हजारो कोटींची तरतूद करूनही सीटी स्कॅन, एमआरआयसाठी रुग्णांना भुर्दंड

मान्सूनपूर्वीच पावसाने मुंबई तुंबली होती. त्यानंतर पाऊस थंडावल्याने साचलेल्या डबक्यांतील मलेरिया, डेंग्यूच्या डासांना बळ मिळाले आहे. त्यामुळे या आजारांसह साथीच्या आजारांचेही संकट गदड झाले आहे. मात्र अशा परिस्थितीतही मुंबईतील उपनगरीय रुग्णालयांतील आरोग्य सेवा मात्र राम भरोसे आहे. हजारो कोटी रुपयांची तरतूद करूनही उपनगरांतील रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय व अन्य चाचण्यांसाठी रुग्णांना भुर्दंड पडत आहे, अशी गंभीर बाब समोर आली आहे.

कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी आज वांद्रे येथील भाभा रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या ही बाब लक्षात आली. हृदयशल्यचिकित्सा लॅब, किडनी विकार, मज्जातंतू विकार, रक्तपेढी अशा सुविधा या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. अनेक महत्वाच्या चाचण्यांसाठी रुग्णांना बाहेर पाठवले जाते. त्यासाठी हजारो रुपये त्यांना खर्च होतो. यासंदर्भात महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्याकडे तक्रारी करूनही त्यांनी दखल घेतली नाही अशी माहिती यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी वर्षा गायकवाड यांना दिली.

सात हजार कोटी गेले कुठे?

2024-25 मध्ये महानगरपालिकेने औषधांसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद केली होती. 14 महिन्यांपासून औषधांसाठी निविदाच काढल्या गेलेल्या नाहीत, मग महापालिकेने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी तरतूद केलेले सात हजार कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला.