
खासगी कंपनीमार्फत शिक्षक नियुक्तीचा निर्णय रद्द करावा, यासाठी तासिकेवर काम करणाऱ्या आदिवासी विकासच्या आश्रमशाळांमधील शिक्षकांचा मुंबईकडे निघालेला पायी बिऱहाड मोर्चा सोमवारी आडगाव येथे धडकला. यावेळी झालेल्या रास्ता रोकोमुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंगळवारी चर्चा करण्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेत आंदोलक नाशिक मुक्कामी थांबले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या राज्यभरातील शासकीय आश्रमशाळांमध्ये वर्ग-3 पदावर तासिकेनुसार मिळणाऱ्या अत्यल्प मानधनावर अडीच हजार शिक्षक दहा-बारा वर्षांपासून सेवा देत आहेत. वर्ग-4 मध्ये शिपाई, स्वयंपाकी, कामाठी यासह अन्य दीड हजार कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करीत आहेत. कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याच्या त्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. 21 मे 2025च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाने पंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीच्या ई-निविदेला मान्यता दिली आहे. यामुळे तासिकेवर व अत्यल्प मानधनावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 21 मे 2025 चा शासन निर्णय रद्द करावा, वर्ग-4ची मृत पदे जिवंत करावीत, या मागण्यांसाठी शुक्रवार, 13 जूनपासून चांदवडजवळील सोग्रस फाटा येथून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबईकडे पायी बिऱहाड मोर्चा काढला आहे. रविवारी त्यांनी पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर रास्ता रोको केला. सोमवारी हा बिऱहाड मोर्चा आडगाव येथे धडकला.
< 17 जून रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेतली, त्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या मंगळवारी, 17 जून रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची भेट घडवून चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतर हे रास्ता रोको थांबविण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग-3, वर्ग-4 कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा योगिताबाली लक्ष्मण पवार व संपर्कप्रमुख अंकुश राजेंद्र चव्हाण यांनी दिला आहे.