
भारतीय शेअर बाजारात 26 ते 30 मे या कालवाधीत तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी चार कंपन्यांनी नफा कमावला तर 6 कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले. या दरम्यान हिंदुस्थानातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एलआयसीचे शेअर 10 टक्क्यांनी वाढल्याने पाच दिवसांत 60 हजार कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल झाले. दरम्यान, रिलायन्स आणि टीसीएससारख्या कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले.
मुंबई शेअर बाजारात गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 270.07 अंकांची घसरण झाली. या पाच दिवसात चार कंपन्यांनी एकत्रितपणे 1.01 लाख कोटींची कमाई केली. यात एलआयसी, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स या सारख्या कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले.
शेअरची किंमत वाढल्याने बाजारमूल्य वाढले
एलआयसीच्या शेअरमध्ये या आठवड्यात 9.94 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या पाच दिवसात एलआयसीचं बाजारमूल्य वाढलं. एलआयसीचं बाजारमूल्य 6,03,120.16 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या नुसार एलआयसीच्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसात 59233.61 कोटी रुपये कमावले.
स्टेट बँक, एचडीएफसी बँक फायद्यात
एलआयसी शिवाय इतर तीन कंपन्यांनीदेखील दमदार कमाई केली. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजारमूल्य 19589.54 कोटी रुपयांनी वाढून ते 725036.13 कोटी रुपये झाली आहे. भारती एअरटेलचे बाजारमूल्य 14082.2 कोटी रुपयांनी वाढून 1058766.92 कोटी रुपयांवर पोहोचले तर खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 8462.15 कोटी रुपयांनी वाढून 1489185.62 कोटी रुपयांवर पोहोचले.